Sunday, June 29, 2025

नौदलात थेट भरती

नौदलात थेट भरती

करिअर : सुरेश वांदिले


भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी. टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत मुलीनांही अर्ज करता येतो. बीटेक पदवी जवाहरलाल नेहरू युनिर्व्हसिटीमार्फत दिली जाते.



या योजनेमधून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती (कमिशन) दिले जाते. त्यांना नॅव्हल ॲकॅडमी, एजिमाला (केरळ) येथे चार वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. या उमेदवारांची शैक्षणिक आणि कार्यकारी, अभियांत्रिकी आणि विद्दुत शाखेसाठी निवड केली जाते. यासाठी, जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन (जेइइ) - मेन या परीक्षेतील गुण आणि प्राधान्यक्रम (प्रिफरन्स) या बाबींचा आधार घेतला जातो. पहिल्या प्रिफरंसमधील शाखा मिळाली नाही तर, जागा उपलब्ध असल्यास उमेदवाराचा विचार दुसऱ्या शाखेसाठी केला जाऊ शकतो. उमेदवाराने केवळ एकच शाखा निवडल्यास, गुणवत्ता यादीत येऊनही दुसऱ्या शाखेसाठी त्याचा विचार केला जात नाही.


या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारास १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ७० टक्के आणि १२ वी किंवा दहावीत इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते.



निवड प्रकिया : प्राथमिक निवड यादीतील उमेदवारांना एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड - सेवा निवड मंडळ)च्या केंद्रांमध्ये मुलाखती / चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते. चाळणी परीक्षेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात बुद्धिमत्ता चाचणी, चित्रांचे अवलोकन / बोध, समूह चर्चा या बाबींचा समावेश असतो. या टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. दुसऱ्या टप्प्याची चाळणी / मुलाखती चार दिवस चालतात.


यामध्ये समूह चर्चा, मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. यात यशस्वी झालेल्या उमदेवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. ही चाचणी साधारणत: तीन ते पाच दिवस चालते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड, नौदलाच्या गरजेनुसार, ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी केली जाते. या काळातील संपूर्ण खर्च नौदलामार्फत केला जातो.
संपर्क - www.joinindiannavy.gov.in <http://www.joinindiannavy.gov.in>



अग्निपथ योजना : लष्करातील तीनही दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने, अग्नीपथ ही योजना कार्यान्वित केली आहे. साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील १० वी / १२ वी उत्तीर्ण मुले या योजनेंतर्गत अर्ज करू शकतात. चार वर्षांसाठी या उमेदवारांची निवड केली जाते. त्यांना सर्व प्रकारचे लष्करी प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या वर्षी त्यांना ४ लाख ७६ लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल. चौथ्या वर्षांपर्यंत या पॅकेजमध्ये ६ लाख ९२ हजार रुपयांपर्यंतची वाढ होईल.


चार वर्षांनंतर सेवानिधीच्या स्वरुपातील, १० लाख ४ हजार रुपये दिले जातील. शिवाय यामध्ये व्याजाची रक्कम समाविष्ट केली जाईल. सेवानिधीच्या रक्कमेला आयकर लागणार नाही. निवड झालेल्या अग्निविरांमधून २५ टक्के अग्निविरांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पुढे सेवेत कायम केले जाईल. काही राज्यसरकार आणि वेगवेगळ्या शासकीय आस्थापनांनी, या उमेदवारांना सामावून घेण्याचे ठरवले आहे. संपर्क - https://www.mygov.in/campaigns/agniveer/


(१) अग्निवीर थलसेना - अग्निवीर जनरल ड्युटी - १० वी उत्तीर्ण, अग्निवीर टेक्निकल - १२ वी (भौतिकशासत्र, गणित, रसायनशास्त्र), अग्निवीर क्लार्क / स्टोअरकीपर - कोणत्याही शाखेतील १२ वी, अग्निवीर ट्रेडसमन - १० वी, अग्निवीर जनरल ड्युटी (महिला पोलीस) - १० वी,


संपर्क - https://joinindianarmy.nic.in/eligibility-criteria-for-agniveer-recruitment-process.htm
(२) वायुसेना - अग्निवीरवायू नॉन कोम्बॅटंट - १० वी, संपर्क - https://agnipathvayu.cdac.in/
(३) नौसेना - अग्निवीर एसएसआर (सिनिअर सेकंडरी रिक्य्रुट)- १२ वी- भौतिकशास्त्र, गणित किंवा ३ वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदवी, एमआर (मॅर्टिक रिक्य्रुट)- १० वी, संपर्क - https://www.joinindiannavy.gov.in

Comments
Add Comment