मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत त्यांनी मुंबईतील रेल्वे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर प्रकाश टाकला आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मिलिंद गवळी यांनी या हृदयद्रावक विषयावर आपली परखड मते मांडली आहेत.
गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गेल्या वीस वर्षांमध्ये मुंबईत रेल्वे अपघातात ५१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे." ९ जून रोजी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले, "विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रेनमध्ये खांबाला लटकलेली माणसे एकमेकांना आदळली आणि १४ जण खाली रुळावर पडली, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला." त्यांनी स्वतःच्या शाळेतील मुख्याध्यापिका वर्गीस मॅडम यांचा वांद्रे येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची आठवणही सांगितली.
गवळी पुढे म्हणतात, "आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत, ज्यांचा कोणी ना कोणीतरी रेल्वे अपघातात दगावला किंवा जखमी झाला आहे." धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पंधरा वर्षांमध्ये रेल्वे अपघातातील १४ हजार मृतदेहांची ओळखच पटलेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
जागतिक स्तरावरील रेल्वे सुरक्षा आणि भारताची स्थिती
जगातील सर्वात सुरक्षित रेल्वे प्रणालींचा उल्लेख करताना गवळी यांनी जपानच्या शिंकानसेन (Bullet Train) प्रणालीचे उदाहरण दिले. गेल्या पन्नास वर्षांत शिंकानसेनमध्ये एकही मृत्यू झाला नसून, तिचा मृत्युदर शून्य आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर चीन आणि स्वित्झर्लंडचा क्रमांक लागतो.
भारतीय रेल्वेबद्दल ते म्हणाले, "भारतीय रेल्वे पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी आहे एवढंच." ब्रिटिशांनी बांधलेल्या रेल्वेत पूर्वी तीन वर्ग होते – फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास. स्वातंत्र्यानंतर थर्ड क्लास रद्द करण्यात आला, तर आता सेकंड क्लासही काढून टाकावा असे गवळी यांचे मत आहे. "आपण सगळे भारतीय फर्स्ट क्लासच आहोत," असे ते म्हणाले.
लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
भारतातील लोकसंख्या ही सर्वात मोठी समस्या असल्याचे मत गवळी यांनी व्यक्त केले. यामुळे कितीही सुधारणा केल्या तरी त्या कमीच पडतात, असे ते म्हणतात. मेट्रोचा उल्लेख करत ते म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोत कुठलाही क्लास नसतो आणि सगळेच प्रवासी फर्स्ट क्लास असतात. पूर्वी मेट्रोमध्ये गर्दी नसायची, पण आता मात्र ती तुडुंब भरलेली असते. अंधेरीच्या पासपोर्ट ऑफिसला जाताना त्यांना वर्सोवावरुन मेट्रो रिकामी मिळाल्याने बसायला जागा मिळाली, पण परत येताना मात्र चकाला स्टेशनला रेल्वेला असते तशीच तुडुंब गर्दी होती, असे त्यांनी सांगितले.
"मी नशीबवान आहे, मला प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे मी त्या चेंगराचेंगरी, गर्दीमध्ये गेलो नाही," असे गवळी म्हणाले. मात्र, सगळ्यांकडे हा पर्याय नसतो. "आपल्या सगळ्यांना गरीब असो की, श्रीमंत पण माणसांसारखा प्रवास करायला मिळावा. गुरंढोरांसारखा नाही," अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.