पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील काटकर पाडा येथे शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. एका मुलाला वाचवण्यात यश आले असून, मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बोईसरमधील काटकरी पाडा परिसरातील असलेल्या खाजगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास भिंत ओलांडून घराच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यापैकी सूरज यादव (७), धीरज यादव (११) या दोन सख्ख्या भावांसह अंकित गुप्ता या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. तर एक ११ वर्षीय मुलगा पाण्याबाहेर निघण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून खड्ड्याने भरलेल्या पाण्यातून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले. वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी तीनही मुलांना मृत घोषित केल्याने शवविच्छेदनासाठी तीनही मृतदेह तारापूर येथे पाठविण्यात आले आहेत.