करंजवण योजना पूर्ण; आ. कांदे यांच्याकडून पाहणी
मनमाड : चार दशकांपासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या मनमाड शहरासाठी वरदान ठरलेल्या करंजवण- मनमाड थेट जलवाहिनी पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी करंजवण योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्णत्वास आले असून, शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण
लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेचे लोकार्पण होणार आहे.
मनमाडकरांना कित्येक दशकापासून होणारा त्रास लवकरच दूर होणार असून करंजवण पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वास गेली आहे. मायभगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवून मनमाडकरांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावून मला पुण्य मिळाले आहे. ही योजना मनमाडकरांच्या सार्थ पाठिंब्याने पूर्ण झाली आहे.
- सुहास कांदे, आमदार