मेट्रो विस्तार, स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती मिळणार
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या शहर वाहतूक व्यवस्थेचा कायापालट साध्य करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने १२,००० कोटींहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अध्यक्ष, एमएमआरडीए) यांच्या नेतृत्वाखाली आणि एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या सक्रिय पुढाकाराने ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या २८४ व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत, अतिरिक्त मुख्य सचिव (१) श्री असीमकुमार गुप्ता, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग आणि अटल सेतूसह विविध महत्त्वाच्या कामांतील कत्राटांरांच्या नेमणुकीसाठी मंजुरी देण्यात आली. या कंत्राटांत प्रणाली, रोलिंग स्टॉक, नागरी कामे, ट्रॅक्शन पॉवर, एएफसी प्रणाली, डेपो पायाभूत सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन यांचा समावेश आहे.
"महाराष्ट्र शासन केवळ आजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नव्हे तर भविष्यातील मागण्यांची पूर्वकल्पना घेतलेली पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. एमएमआरडीएकडून मंजूर झालेली ही १२,००० कोटींपेक्षा अधिक किमतीची गुंतवणूक मुंबईच्या एकात्मिक आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक गती, शहरी गतिशीलता आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर "एमएमआरडीएकडून झालेली ही ऐतिहासिक मंजूरी महाराष्ट्र सरकारच्या जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधेच्या बांधणीसाठीच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. १२,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीद्वारे आम्ही एक समतोल, शाश्वत आणि आधुनिक मेट्रो नेटवर्क घडवत आहोत. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आयएएस एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, मंजूर झालेले प्रत्येक प्रकल्प हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकात्मिक विकासात मोलाचा वाटा उचलेल याची खात्री करून घेतली आहे. सिस्टम्स इंटिग्रेशन, रोलिंग स्टॉक, ट्रॅक्शन पॉवर, AFC व मल्टी-मोडल इंटिग्रेशन या सर्व घटकांना जोडणारी ही कंत्राटे आम्ही ऑपरेशनल रेडिनेस लक्षात घेऊन मंजूर केली आहेत. शेवटच्या टप्प्याच्या जोडणीवर आमचा भर असून, प्रवाशांसाठी सहज, गतीशील आणि एकात्मिक वाहतूक संरचना निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.