मुंबई: भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पुढील २४ तासात मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने आज सायंकाळी ५:३० पासून २५ जून रोजी रात्री ८:३० वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा दिला आहे, त्यामुळे या काळात लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पुढील २४ तासांत पुन्हा मुसळधार
गेल्या दोन दिवसांपासून थोडी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील २४ तासांत कोकण आणि घाट भागात काही ठिकाणी हलका-मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्याच्या आतल्या भागातही हलका-मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भासाठीही हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे.
विदर्भावर मान्सून होणार मेहरबान
विदर्भातील नागरिकांवर मान्सूनच्या ढगांची मेहरबानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या मंगळवारी २४ जूनपासून अकोला, नागपूरसह विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जूनपासून पुढील पाच दिवस, म्हणजे शनिवार २८ जूनपर्यंत विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत मात्र मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भात, सोयाबीन, कापूस पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे.