पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात फोनवरुन ४५ मिनिटे चर्चा झाली. दोन्ही देशांनी एकमेकांमधील दृढ करण्याची परस्परांना हमी दिली. भारत हा प्रादेशिक शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी काम करणारा देश असल्याचे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले. तणाव करण्यासाठी भारताने सुचविलेल्या सल्ल्यांवर इराण गंभीरपणे विचार करेल, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले. त्यांनी तणावाच्या काळातही इराण सोबत राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी भारताची साथ महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
इस्रायल आणि इराण यांच्यात दहा दिवसांपासून लढाई सुरू आहे. अमेरिकेने इराणमध्ये निवडक ठिकाणी बॉम्ब टाकले. इराणची आण्विक शक्ती नष्ट करण्यासाठी ही कारवाई केल्याचे सांगत अमेरिकेने इस्रायलच्या इराण विरोधी कारवाईला पाठिंबा जाहीर केला. आवश्यकता भासल्यास इराण विरोधात आणखी कठोर कारवाई करू, असेही अमेरिकेने जाहीर केले. तर अमेरिका इराणवर हल्ला करणार असेल तर आम्ही अमेरिकेला धडा शिकवू, असा धमकीवजा इशारा येमेनेमधील हुती अतिरेकी संघटनेने दिला आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या लढाईत अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी आहे. पण अमेरिकेने केलेला हल्ला आणि त्यांचा इस्रायलला असलेला पाठिंबा म्हणजे इराण विरोधातील कारवाईच असल्याचे इराण सरकारने जाहीर केले. इस्रायलने १३ जून २०२५ रोजी आण्विक शक्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने इराणवर हवाई हल्ले सुरू केले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने वेगवेगळ्या उंचीवरुन उडणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करुन इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकवून हल्ले सुरू केले आहेत.