
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं 93 व्या वर्षी निधन
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले, ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मारुती चित्तमपल्ली हे मराठी वन्यजीव अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते. जंगल प्रत्यक्ष जगणाऱ्या या व्यक्तिमत्वाने वनाधिकारी म्हणून तब्बल ३६ वर्षे नोकरी केली. निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक वर्ष जंगलात काढली. यादरम्यान जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे टिपत त्यासंबंधित त्यांनी अनेक लेखनी देखील केल्या. त्यांना वन्यजीव संवर्धन, साहित्य आणि शिक्षणातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी "अरण्य ऋषी" - वनऋषी म्हणून ओळखले जात होते. असे हे थोर व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाले.
मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद) चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते. त्यांच्या या एकंदरीत कारकिर्दीची दखल घेत त्यांना यावर्षी दिनांक १८ एप्रिल, २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक अशी त्यांना ओळख मिळाली. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. रानवाटा, जंगलाची दुनिया, निळावंती, निसर्गवाचन, पक्षिकोश यांसारख्या गाजलेल्या पुस्तकांचा यात समावेश आहे.
सुरुवातीचे जीवन आणि बालपण
मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली असे आहे. त्यांच्या आईच्या निसर्गावरील प्रेमाने प्रेरित होऊन, चितमपल्ली यांना जंगलाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले. त्यांनी १९५८ मध्ये कोइम्बतूर येथील राज्य वन सेवा महाविद्यालयात औपचारिक प्रशिक्षण घेतले, वन संवर्धनातील त्यांच्या आयुष्यभराच्या प्रवासाचा पाया येथेच रचला गेला.