आळंदी : जगतगुरूश्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा प्रस्थान सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. या अनुपम प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी पोलिस दल, प्रशासकीय यंत्रणांची सज्ज आहेत. आळंदी पोलिस ठाण्यानं यंदाच्या वारीत अधिकारी, कर्मचारी व विविध पोलिस पथके असं जवळपास २ हजार मनुष्यबळ तैनात केलयं.
आषाढी वारीला सुरुवात झालीय. विठूरायाच्या भेटीची आस असलेले वारकरी ज्ञानबा-तुकारामचा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं देहू आणि आळंदी इथं दाखल होताहेत. बुधवारी जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे.
प्रस्थान सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांच्या गर्दीनं देहूनगरी फुललीय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी आलेल्या वारकरी-भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
देहू नगरपंचायतीनं मुख्य मंदिर व परिसर, इंद्रायणी घाट, वैकुंठस्थान मंदिर, पीएमपी बसस्टॉप, देहूतील मुख्य रस्ते, अनगडशहा बाबा दर्गा, पाण्याचे टँकर उपलब्ध असणारी ठिकाणे, उपचार केंद्र, पोलिस मदत केंद्र आदी ४२ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. यातून संपूर्ण पालखी सोहळ्यावर बारीक नजर ठेवण्यात येणारेय. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा होणार असल्यानं आळंदीमध्येही दिंड्या मोठ्या संख्येने दाखल होताहेत. प्रस्थान सोहळा कालावधीत २० जूनपर्यंत आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळं आजपासून शहरात वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे.केवळ दिंड्यांच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यावर यंदा अतिपावसाचे सावट आहे. माउली मंदिर आणि संपूर्ण आळंदीचा प्रस्थान सोहळा हा इंद्रायणी नदी घाटाभोवती पार पडत असतो. या काळात इंद्रायणी नदी घाटावर अनेक वारकरी जमा होतात. प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. सहा दिवसांपूर्वीच इंद्रायणीची पाणीपातळी चांगलीच वाढलीय. चार दिवसांपासून इंद्रायणी नदीपात्र परिसरात मावळपासून आळंदीपर्यंत पाऊस सुरू आहे. हवामान विभागानंही आगामी ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळं या सोहळ्यासाठी हवामानाचा अंदाज लावून नदीच्या पाणीपातळीचा विचार करत प्रशासनाला अधिक सतर्क रहावं लागणार आहे.