
मुंबई (प्रतिनिधी) : यंदा मान्सून आधीच दाखल झाल्याने पाणीकपात नाही, म्हणून मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता, मात्र तलाव क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पाऊस अजून लांबल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. शिल्लक साठा व पावसाचा अंदाज घेत यावर्षी मुंबई महापालिकेने पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावातील पाणीपातळी घटल्यामुळे राखीव पाणी साठ्यातून मुंबईत पाणी आणण्यात येणार आहे.
यातून मुंबईकरांची तहान भागणार असली तरी फार काळ राखीव कोट्यातील पाणीसाठा वापरणे शक्य नाही. येणाऱ्या आठवडाभरात तलाव क्षेत्रात पाऊस दाखल झाला, तर ठीक अन्यथा सध्याचा पाणीसाठा मुंबईकरांना अजून महिनाभर पुरवण्यासाती मुंबई महापालिकेसमोर पाणीकपात करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.