
रायगड, रत्नागिरीला ‘रेड’, तर पालघर, जळगाव, अहिल्यानगरला ‘ऑरेंज अलर्ट’
मुंबई : महाराष्ट्रात मॉन्सूनने जोर धरला असून, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी (दि. १४ जून) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) जारी केला आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) लागू आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच, अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.
कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीम परिसरातील चक्राकार वाऱ्यांची स्थितीही पावसाला पूरक ठरत आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!
रायगड आणि रत्नागिरीतील रेड अलर्टमुळे स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे नदीकाठच्या गावांना विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्टमुळे प्रवास आणि दैनंदिन कामकाजात खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत येलो अलर्ट असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे.
पावसाचा परिणाम आणि खबरदारी :
मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्ते, रेल्वे आणि स्थानिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर भूस्खलनाचा धोका असल्याने प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.