रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात ३७ वर्षांनंतर पुराचे पाणी शिरले आहे. तालुक्यातील भालावली, धाऊलवल्ली, कोतापूर, नवेदर परिसराला पावसाचा तडाखा बसला असून घरांमध्ये पाणी शिरले, तर रस्ते आणि पुलांची दुर्दशा झाली आहे.




तब्बल ३७ वर्षांनी पुराचे पाणी


जिल्ह्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यात पडलेल्या पावसाने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला चांगलाच दणका दिला. या मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून मध्यरात्री या पुराच्या पाण्याने सहा फुटांपर्यंत धडक मारली होती. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आडिवरे येथील प्रसिद्ध श्री महाकाली देवी मंदिर परिसरात पाणी शिरले होते. तब्बल ३७ वर्षांनंतर ही पूरपरिस्थिती निर्माण झाली. भालावली, धाऊवल्ली, कशेळी, नवेदर, कोतापूर या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. धाऊलवल्ली भाटलेवाडी येथील वहाळावरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. राजवाडी वाडा भराडे येथील रस्त्यावर दरड कोसळली. भालवली परिसरात काही घरांमध्ये नदीला आलेल्या पुरांचे पाणी शिरले होते. काही घरांमध्ये सुमारे चार ते पाच फूट पाणी शिरले.



अनेक घरे, मंदिरांचं नुकसान


भालावली गिरवणेवाडी येथे दरड कोसळून गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. मोगरे सडेवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे. नवेदर येथील दिनेश पांचाळ यांच्या घरात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. भालावली येथे अनेक घरे, मंदिर तसेच सार्वजनिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे. भालावली येथील मिलिंद आडविरकर यांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाडा तिवरे येथे मधुकर गावकर यांच्या घरालगत दरड कोसळुन नुकसान झाले आहे. धाऊलवल्ली ग्रामपंचायतीचेही नुकसान झाले आहे. कोतापूर गावात कोतापूर वड ते एकवीरा देवी मंदिर या मार्गावरील नुकत्याच झालेल्या डांबरी रस्त्याची अवस्था या पावसाने अक्षरशः दयनीय झाली आहे.


पावसाच्या जोरदार प्रवाहाने रस्त्याचे डांबर उखडले असून, ठिकठिकाणी खड्डे आणि खाचखळगे निर्माण झाले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गावातील कही घरांच्या अंगणात आणि काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. रिजवान मोनये यांच्या गॅरेजमध्ये पाणी शिरले. त्यामुळे गॅरेजमधील सामानाचे नुकसान झाले आहे. संतोष नवरे, गौरव नवरे, विवेक प्रभुघाटे, अरुण दीक्षित, विनायक प्रभुघाटे आणि वैभव नवरे यांनी गॅरेजमधील सामान बाजूला हलवण्यासाठी मदत केली.


कोतापूर लक्ष्मी केशव मंदिराखालील करप्याच्या आगरातील एक नंबर शाळेपर्यंत जाणारा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, गावकऱ्यांना, शाळेतल्या मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे. ओंकार प्रभुघाटे यांच्या गारगेश्वर मंदिरासमोरील आगराचा संपूर्ण गडगा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे शेती आणि परिसरातील जमिनींचेही नुकसान झाले आहे. गंगाराम जाधव यांच्या काजू फॅक्टरीजवळील विहिरीसमोरील कुंपण मोठ्या प्रमाणात कोसळले आहे.


आज सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ११९.८७ मि. मी. पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली आहे. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून तहसीलदार विकास गंबरे यांनी गाव व वाडीवस्तीवरील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात ७७.५५ मिमी, लांज्यात ५८.६० मिमी, संगमेश्वरमध्ये ५१.९१ मिमी, खेडमध्ये ४८.५७ मिमी, दापोलीत ४७.५७ मिमी, मंडणगडमध्ये ३१.७५ मिमी, चिपळूणमध्ये २५.५६ मिमी, तर गुहागरमध्ये २२.८० मिमी पावसाची नोंद झाली.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!

पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार नेसा 'या' शुभ रंगांची साडी

मुंबई : विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही तासांवर

Vat Purnima 2026: यंदाची वटपौर्णिमा ठरणार खास; सोमवारी दुर्मिळ शुभ संयोग, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

यंदा वटपौर्णिमा (Vat Purnima 2026) २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार असून या वर्षीचा सण धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे.

Soccer Ball : फुटबॉल इतिहासातील ५ अजरामर बॉल; ज्यांनी बदलली खेळाची दिशा!

फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूंचे कौशल्य जितके महत्त्वाचे असते, तितकेच महत्त्वाचे असते तो 'बॉल'. तंत्रज्ञान आणि