
तीन किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्यांना होणार फायदा
मुंबई : बस भाडे कमी केल्यानंतर वाढणारा तोटा लक्षात घेता बेस्टने बसभाडे १०० टक्के वाढवले मात्र दिवसेंदिवस प्रवाशांमध्ये होणारी घट लक्षात घेता बेस्ट उपक्रम भाडे कमी करण्यासाठी विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे भाडे २ ते ३ रुपयांनी कमी करण्यासाठी तसेच मार्ग किलोमीटरचे नवी रचना करण्याचे काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेस्ट भाडेवाढीनंतर दैनंदिन प्रवाशांची संख्या सुमारे ४ लाख ५० हजारांनी कमी झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. नुकतीच बेस्ट अधिकाऱ्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली जिथे कमी झालेल्या प्रवाशांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. विना वातानुकूलित बसेससाठी १ ते ३ किलोमीटरसाठी नवा टप्पा बनवण्यात येणार असून हे भाडे ७ ते ८ रुपयांपर्यंत कमी होईल "वातानुकूलित बसेससाठीही हाच मार्ग अवलंबला जाईल. कारण की १ ते २ किमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील ५ किमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांइतकेच भाडे द्यावे लागत आहे. तसेच सध्याच्या बेस्टच्या भाड्याची तुलना शेअर ऑटोरिक्षा व शेयर टॅक्सिची भाड्याशी करण्यात आली असून त्यांना स्पर्धात्मक बनवण्याची गरज असल्याचे आढळून आले आहे.
बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑटोरिक्षा शेअर करणाऱ्या प्रवाशांपेक्षा कमी पैसे द्यावे लागतील अशी ही रचना करण्यात येणार असून भाडे कमी करण्याचा हा फॉर्म्युला बेस्ट बनवणार आहे. यावर नवीन रचनेवर काम सुरू असून आवश्यक मंजुरीनंतर ते लागू करण्यात येईल. बेस्टच्या बस भाड्यात सहा वर्षांहून अधिक काळ वाढ करण्यात आली नव्हती आणि प्रत्यक्षात २०१९ मध्ये ते कमी करण्यात आले. बेस्टच्या बस भाड्यात अलिकडेच झालेल्या वाढीमुळे दरवर्षी ५९० कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. सध्या, विना - वातानुकूलित बसेससाठी १० रुपये आणि पहिल्या ५ किमी चालणाऱ्या वातानुकूलित बसेससाठी १२ रुपये भाडे आहे. २० किमी प्रवासानंतर प्रत्येक ५ किमीसाठी ५ रुपये वाढ होते आणि बसेस मुंबई जिल्ह्याच्या हद्दीतून गेल्यास स्थानिक कर म्हणून अतिरिक्त २ रुपये आकारले जातात.