अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (१२ जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील २४१ प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या २४ जणांचा मृत्यू झाला. यावेळी विमानात १० केबिन क्रू मेंबर्ससह एकण २४२ प्रवासी होते. अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वाचला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. तसेच विमान मेघानी परिसरात ज्या वसतीगृहाच्या इमारतीला धडकलं तेथील काही शिकाऊ डॉक्टरांचाही अपघातात जीव गेला. याच अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू मेंबर असलेल्या बदलापूरच्या दीपक पाठकनेही जीव गमावलाय.
आईला शेवटचा फोन
काल विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी, सकाळीच तो आपल्या आईशी फोनवर बोलला होता. ‘गुड मॉर्निंग आई’ म्हणत त्याने तिच्याशी गप्पाही मारल्या, मात्र आपण आपल्या मुलाचा आवाज शेवटचा ऐकत आहोत, याची त्या माऊलीला जराही कल्पना नव्हती. विमान अपघातात दीपकचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या गावी शोककळा पसरली आहे, अपघाताची बातमी ऐकून त्याचे मित्र आणि कुटुंबियांनी तातडीने घरी धाव घेतली. सकाळीच दीपक त्याच्या आईशी फोनवर बोलला. मात्र त्यानंतर त्याचा घरच्यांशी काहीच संपर्क झाला नाही. दीपक पाठकच्या बहिणीने सांगितले की, सकाळीच तो त्याच्या आईशी शेवटचा बोलला, तिला गुड मॉर्निंगही म्हणाला. अपघाताची बातमी आल्यापासून त्याच्याबद्दल काहीच माहिती कळली नव्हती, असेही तिने सांगितलं.
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी (१२ जून) एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यावेळी विमानात २४२ प्रवासी होते. या ...
कुटुंबाचा विश्वासच बसेना
विमान दुर्घटनेची बातमी समजल्यानंतर दीपकच्या कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधायचा खूप प्रयत्न केला, त्याचा फोन तर वाजत होता पण कोणीही फोन उचलला नाही, असे कुटुंबातील एकाने सांगितलं. जोपर्यंत तो फोन वाजत राहील, तोपर्यंत आम्ही या (त्याच्या मृत्यूच्या) वाईट बातमीवर विश्वास ठेवणार नाही, असेही ते म्हणाले.
११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये होता दीपक
दीपक पाठक हा बदलापूरचा रहिवासी होता, गेल्या ११ वर्षांपासून तो एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होता. काल सकाळी त्याने आईला फोन केला आणि गप्पा मारल्या, असं बहिणीने सांगितलं. आमच्या व्यस्त दिनचर्येमुळे आम्ही खूपदा बोलू शकत नसलो तरी, मी आणि माझी आई त्याच्याबद्दल नियमितपणे बोलतो, तो कुठे आहे, घरी आला का याची माहिती घेत असे, असेही त्यांनी नमूद केलं. पाठक कुटुंबात ५ भावंडे असून, दीपकचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तर मुंबईतील पवई येथील जल वायु विहार भागात असलेले विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या घरी शोकाकुल वातावरण आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सभरवाल यांच्या पालकांची भेट घेतली.