Ahmedabad plane crash: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीसह २४२ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील सात प्रवाशांचा समावेश

हॉस्टेल इमारतीवर विमान आदळल्याने विद्यार्थीसह अनेक जखमी


अहमदाबाद : गुजरातमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI 171 विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. मात्र टेक-ऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच, केवळ ६२५ फूट उंचीवर असताना मेघानीनगर भागात हे विमान कोसळले. एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत किमान २४२ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले असून महाराष्ट्रातील सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच २० वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, सीआरपीएफ तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे.


विमानातील एकूण २४२ प्रवाशांमध्ये, १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. या शिवाय १२ क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहितीनुसार यामध्ये २ नवजात बाळ, ११ लहान मुले, २१७ प्रौढ प्रवासी प्रवास करत होते.


या अपघातात बी.जे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जेवत असलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांवरही मोठा आघात झाला. हॉस्टेल इमारतीवर विमान आदळल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले. भारतीय वैद्यकीय संघटनेनुसार, यामध्ये तीन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे ४५ विद्यार्थी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत २० वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे.


अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्राचेही सात प्रवासी उपस्थित होते. यामध्ये चार केबिन क्रू आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : अपर्णा महाडिक (खासदार सुनील तटकरे यांचा भाचा अमोल यांची पत्नी आहेत.) महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि शनी सोंघरे. याशिवाय, राजस्थानमधील पाच प्रवाशांचाही या अपघातात मृत्यू झाला.


अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी. एस. मलिक यांनी अधिकृतरित्या २०४ मृतांची संख्या जाहीर केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.


या दुर्घटनेनंतर गुजरात आरोग्य विभागाने नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलतर्फे 6357373831 आणि 6357373841 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. तसेच, BJ मेडिकलमध्ये डीएनए चाचणी सुरू असून नातेवाईकांना डीएनए नमुने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मृतांची ओळख पटवणे सुलभ होईल.


या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले. राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही दु:खद माहिती शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, "विजय रूपाणी यांचे अकाली निधन ऐकून सुन्न झालो आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या हार्दिक संवेदना."


संपूर्ण देशात या दुर्घटनेने शोककळा पसरली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विविध नेत्यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.