बंगळुरू: आयपीएल २०२५चे विजेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजय परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला तर ५६ जण जखमी झाले. यानंतर अनेक राजकीय पटलावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यावर आता पहिल्यांदाच राहुल द्रविडचे विधान समोर आले आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरीवर राहुल द्रविडने केले भाष्य
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने आयपीएल जिंकल्यानंतर, बंगळुरूमध्ये उत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीवरून सतत वेगवेगळे वाद सुरू आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५६ जण जखमी झाले. भाजप आणि इतर विरोधी पक्षांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचवेळी, देशातील अनेक सेलिब्रिटींनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यानुसार, आता माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनेदेखील बंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत आपले विधान जारी केले आहे. राहुल यांनी या प्रकरणावर काय म्हटले ते जाणून घेऊया.
राहुल द्रविडने चेंगराचेंगरीवर काय म्हटले?
माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे. राहुल यांनी या अपघाताला दुर्दैवी आणि दुःखद म्हटले आहे. राहुल म्हणाले- "हे खूप निराशाजनक आहे, खूप दुःखद आहे, माझ्या संवेदना त्या लोकांसोबत आहेत. बंगळुरूच्या क्रीडा संस्कृतीचा विचार करता हा अपघात आणखी वेदनादायक आहे. बंगळुरू हे खेळांचे चाहते असलेले शहर आहे. मी देखील याच शहरातील आहे.
द्रविडने आरसीबीबद्दल काय म्हटले?
बंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत राहुल द्रविड यांनी आपले मत व्यक्त करताना म्हंटले, की "बंगळुरूमधील लोकांना फक्त क्रिकेटच नाही तर प्रत्येक खेळ आवडतो आणि ते संघांचे अनुसरण करतात. आरसीबीचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. ही दुर्घटना खूप दुःखद आणि दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आमची संवेदना."
दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत सतत कारवाई सुरू आहे. आतापर्यंत पोलिस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांच्यासह अनेकांना अटकही करण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात निखिल सोसाळे यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला असून, न्यायालयाने ११ जूनपर्यंत आपला आदेश राखून ठेवला आहे.