छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध अंजिठा लेण्यांजवळील सप्तकुंड धबधबा बघायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. बकरी ईदची सुट्टी आणि शनिवार-रविवारचा योग साधून मोठ्या संख्येने पर्यटक येथे जमले होते. पण दुपारी अचानक मधमाशांच्या थव्याने गर्दीवर हल्ला केल्याने एकच अफरातफरी माजली.
या हल्ल्यात तब्बल २०० हून अधिक पर्यटक जखमी झाले असून, अनेकांना तातडीने वैद्यकीय मदत द्यावी लागली. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मधमाशांच्या हल्ल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
पर्यटनस्थळ असूनही सुरक्षेच्या बाबतीत पुरेशा उपाययोजना न केल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता होत आहे.