नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारताच्या या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा सन्मान करण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे. या वर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यावेळी रोहित आणि विराटचा
हा सन्मान करण्यात येणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचप्रमाणे भारताच्या २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.
दोन्ही क्रिकेटपटू केवळ एकदिवसीय सामने खेळतानाच क्रिकेटप्रेमींना पहायला मिळणार आहेत. रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर लगेचच १२ मे रोजी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
भारतीय संघ ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. हा दौरा दोन्ही दिग्गजांसाठी कदाचित ऑस्ट्रेलियामधील अखेरचा दौरा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेटपटूंचा सन्मान करण्याचा विचार करत आहे.
टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळत राहण्याचा मानस या दोन्ही क्रिकेटपटूंचा आहे. दरम्यान, कोहलीने आयपीएल २०२५ मध्ये आपला फॉर्म दाखवततर रोहितने स्पर्धेच्या अखेरीस महत्त्वपूर्ण खेळी केल्या. आता आगामी एकदिवसी सामन्यांमध्ये या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना आहे.