४० हजार पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा

जून महिन्यातही पाणीटंचाई कायम


पालघर : जिल्ह्यातील मोखाडा, वाडा, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाई जून महिन्यातही कायम आहे. अवकाळी पावसाची हजेरी सुरू असली तरी, पाणीटंचाई कायम असल्याने या चार तालुक्यातील १३३ गावपाड्यांमध्ये ३९ हजार ८०५ पशुधनासह ४२ हजार नागरिकांसाठी टँकरद्वारे पाण्याची सोय करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी मोखाडा, वाडा, जव्हार आणि विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये नेहमीच पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ या तालुक्यांमधील ग्रामस्थांवर येते. त्यामुळे उन्हाळा लागण्यापूर्वीच मोखाडा आणि वाडा तालुक्यातील काही पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते. यावर्षी सुद्धा वाडा व मोखाडा या दोन तालुक्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये सुद्धा पाणीटंचाईची समस्या मार्च महिन्यापासून दिसून येत आहे.



दरम्यान मोखाडा तालुक्यातील पाणीटंचाई पाहता या तालुक्यात ७ जानेवारीपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर वाडा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त पाड्यांसाठी २९ जानेवारीपासून तर जव्हार तालुक्यातील पाड्यांमध्ये ४ फेब्रुवारीपासून आणि १० एप्रिलपासून विक्रमगड तालुक्यातील चार टंचाईग्रस्त पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असतानाच पाणीटंचाईची चटके सुद्धा जाणवू लागले, त्यामुळे १५ एप्रिल नंतर आणखी २२ पाड्यांमध्ये आणि ११ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, तर उन्हाच्या दाहकतेसोबतच आणखी पाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने मे महिन्याच्या सुरुवातीला आणि दुसऱ्या आठवड्यापासून टंचाईग्रस्त पाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जून महिना सुरू असतानाही पाणीटंचाई कायम असल्याने आता चार तालुक्यात एकूण १३३ गावपाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


तालुका       गाव   पाडे   टँकर
मोखाडा      ०४    ३३      १२
वाडा           ०५    ३९     ०६
जव्हार        ०६    २९     १६
विक्रमगड   ००    १७     ०२
एकूण         १५    ११८    ३६




पाणीटंचाई निर्माण होत असलेल्या गावपाड्यातून मागणी येताच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांप्रमाणेच तेथील पशुधनाचा विचार करून टँकरच्या फेऱ्या नियोजित करण्यात येतात. पाणीटंचाई निवारणासाठी विंधन विहिरीच्या कामासोबत इतर उपाययोजनांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- रवींद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.



Comments
Add Comment

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना