जिल्ह्यातील अनेक बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात
दिंडोरी: सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण या आदिवासी भागात पावसाळ्यात येणार्या रानभाज्यांचे (Wild Vegetables) यंदा लवकर आगमन झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचाही या भाज्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोणत्याही प्रकारची नियोजित शेती किंवा निगा न राखता, रानावनात तसेच पायवाटात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाज्यांमध्ये पोषकतत्त्वांचा मुबलक खजिना असल्याने आयुर्वेदात त्यांना वरचे स्थान आहे.
आदिवासी भागात पारंपरिक अन्न
जंगलात शेतांच्या बांधावर, माळरानात त्या आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. आदिवासी भागात त्या आवर्जून खाल्ल्या जातात. आदिवासी भागात शेवळा, वाघाटा, दिघडी आदींचा आजही पारंपरिक अन्न म्हणून वापर होतो. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून, जुन्या पिढीतील व्यक्तींना भाज्यांचे औषधी गुणधर्म माहीत आहे. नवीन पिढीतही हे ज्ञान कायम आहे. या वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनल्या आहेत. बाजारपेठेतून येणारा भाजीपाला विकत घेण्यापेक्षा जंगलात येणार्या रानभाज्या शोधण्यासाठी आदिवासी लोक आता भर देत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे.
शेवळा, चाई, कवळी, मोखा, इगळी, रुखाळू, तेरा, दिघडी, वाघाट, तरण, काटवल, माल कामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, केना, कोंबडा, तरोटा, पानवेल, काळा पेठारा, पांढरा पेठारा, बांबूवाष्टे, भराटी, मटारू, राजगिरा, रानआल, रानकोचई, रानमटाळू, वाघोटी, तांदुळजा, पाथरी, माठ, घोळ, टाकळा, सराटे ई रानभाज्यांचे प्रकार आढळून येतात.
रानभाज्या या जंगलात बिगरखतांच्या उगवत असल्याने या भाज्या खाल्ल्यास शरीरास उपयोगी पडणारे क्षारांचे प्रमाण म्हणजे प्रोटीन, कॅल्शिअम, टाइप टू न्यू ट्रेन जास्त असतात. त्यामुळे आम्ही नागरिकांना पावसाळ्यात रानभाज्या खाण्याचे आवाहन आवर्जून करतो, असे डॉ. दिलीप रणवीर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सुरगाणा यांनी सांगितले.