नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देशभरात कोरोना विषाणूचे ६,१३३ सक्रिय रुग्ण असून, ६,२३७ रुग्णांनी संसर्गावर मात केली आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशात ६ जणांचा कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या कमी जरी असली, तरी दिवसागणिक वाढणारे सक्रिय रुग्ण कोरोना महामारीबद्दल चिंता वाढवत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्यास, आणि आवश्यक उपाययोजना त्वरित राबवण्यास सांगितले आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाचे प्रमाण वाढत असून ६६५ सक्रिय प्रकरणांची नोंद झाली आहे. तर, केरळमध्ये ३, कर्नाटकमध्ये २ आणि तामिळनाडूमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये केरळमधील तिघांचे वय अनुक्रमे ५१, ६४ आणि ९२ वर्षे होते. कर्नाटकमधील दोन पुरुष रुग्ण ४६ आणि ७८ वर्षांचे, तर तामिळनाडूतील रुग्ण ४२ वर्षांचा होता. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेले सर्व रुग्ण पुरुष होते.
देशभरात कोरोनामुळे एकूण ६१ मृत्यू
जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे एकूण ६१ मृत्यू झाले आहेत. एकट्या दिल्लीमध्येच यावर्षी आतापर्यंत ७ जणांनी प्राण गमावले आहेत. रविवारी (दि.८) सकाळपर्यंत देशात ५,७५५ सक्रिय रुग्ण होते आणि ५,४८४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.
कोरोनाचे हे पुन्हा डोके वर काढणे लक्षात घेता, केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्यास आणि कोविड व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, यावेळी कोरोना फारसा धोकादायक नसला तरी वयस्कर, आजारी आणि लहान मुलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण करणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करणे ही मूलभूत खबरदारी महत्त्वाची आहे.