अक्षय मुडावदकर आणि नचिकेत बर्वे यांच्या हस्ते स्वामी भक्तांना १५०० बेसन लाडूचे प्रसादरूप वाटप
पुणे: कलर्स मराठीवरील लोकप्रिय "जय जय स्वामी समर्थ" ने मालिकेने नुकताच १५०० भागांचा टप्पा पार केला. या खास निमित्ताने मालिकेतील स्वामी समर्थ साकारणारे अक्षय मुडावदकर आणि बाळप्पाची भूमिका साकारणारे नचिकेत बर्वे यांनी पुण्यातील धनकवडी येथील मठात त्यांच्या हस्ते १५०० बेसन लाडवांचे प्रसादरूप वाटप केले आणि त्यानंतर भक्तांसोबत संवाद साधला. आजवर मालिकेमध्ये स्वामींनी भक्तांचा कसा उद्धार केला, केलेले चमत्कार, त्यांच्या लीला आणि मार्गदर्शनाच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांनी अनुभवल्या आहेत. ही मालिका केवळ एक मनोरंजन माध्यम न राहता अनेकांसाठी श्रद्धेचा आणि आशेचा केंद्रबिंदू बनली आहे.
अक्षय मुडावदकर व्यक्त केली भावना
अक्षय मुडावदकर म्हणाले,"या भूमिकेने माझ्या आयुष्याला नवा अर्थ दिला आहे. १५०० भाग हा एक केवळ आकडा नसून हे त्या भक्तीचा आणि प्रेमाचा ठेवा आहे जो प्रेक्षकांनी आम्हाला दिला आहे. धनकवडी मठात लाडवांचा नैवेद्य अर्पण करणं आणि भक्तांना प्रसाद वाटणं ही माझ्यासाठी आशीर्वादासारखी अनुभूती होती. मठात आम्हांला अनेक भक्त भेटले आणि त्यांच्याशी सवांद साधता आला याचा खूप आनंद झाला. त्यांची कौतुकाची थाप मिळाली. प्रत्येकाच्या मुखातून एकच इच्छा आली हि मालिका अशीच अविरत सुरु राहूदे. मालिकेद्वारे स्वामींच्या लिला आमच्या पर्यंत छान पध्द्तीने पोहचत आहेत. आमच्या मालिकेने साडेचार वर्ष सुरु आहे, १५०० भागांचा टप्पा गाठला आहे, यांचा अभिमान आहे. हि मालिका करण्याची संधी मिळणे म्हणजे न भूतो न भविष्यती अशी संधी आहे. हि मालिका माझ्या आयुष्याला एक वेगळं वळणं देणारी ठरली, नेहेमीच खास असेल माझ्यासाठी. प्रेक्षकांचे मनापासून आभार असंच प्रेम असू द्या!"