Saturday, June 14, 2025

Samruddhi Expressway : समृद्धीचा नवा अध्याय... नागपूर ते मुंबई, आता फक्त आठ तासांत"

Samruddhi Expressway : समृद्धीचा नवा अध्याय... नागपूर ते मुंबई, आता फक्त आठ तासांत

नागपूर : मुंबई समुद्धी महामार्ग हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न. अनंत अडचणींवर मात करत समृद्धी महामार्ग आता पूर्ण झालाय. महाराष्ट्राच्या प्रगतीत एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. या समृद्धी महामार्गामुळे उपराजधानी नागपूर हाकेच्या अंतरावर आलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर चला जाणून घेऊयात नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाची संपूर्ण कहाणी.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट अर्थात समृद्धी महामार्ग. महाराष्ट्रात विकासाचा मौलाचा दगड ठरणारा समृद्धी महामार्ग पूर्णत्वास गेलाय. त्यामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर आता अवघ्या आठ तासांत पार करणं शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यात महत्त्वाची भूमिका पार पाडलीय. अनंत अडचणींचा सामना करत महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केलाय. ५ जून २०२५ रोजी इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी समृद्धी महामार्गाची संकल्पना २०१६ मध्ये मांडली गेली. ७०१ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग फक्त नागपूर ते मुंबई या दोन शहरांनाच जोडत नाही तर तो विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राला एकत्र आणतो. प्रवासाचा वेळ वाचवणं आणि व्यापार-उद्योगांना चालना देणं, ग्रामीण भागाला शहरांशी जोडणं हेही समृद्धी महामार्गाच्या मागचं उद्दिष्ट आहे.



आता पाहूयात समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये


समृ्द्धी महामार्गात ८ बोगदे, ३६ टोल नाके आणि ४०० हून अधिक पूल आणि उड्डाणपूल आहेत. या महामार्गासाठी ५५ हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे नागपूर ते मुंबईचा प्रवास १६ तासांवरून ८ तासांवर आलाय.त्यामुळे हा केवळ रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा, विकासाचा मार्ग आहे, असं म्हटलं जातंय. तसंच समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगार, उद्योग आणि समृद्धी येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय.


०५ जून २०२५ रोजी, समृद्धी महामार्गाचा शेवटचा ७६ किलोमीटरचा टप्पा इगतपुरी ते आमणे वाहतुकीसाठी खुला होत आहे. हा टप्पा बांधण्यासाठी ८ किलोमीटरचा कसारा-इगतपुरी बोगदा आणि अनेक तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागला. या टप्प्यामुळे मुंबई आणि नाशिकमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या टप्प्यात अत्याधुनिक सुरक्षा उपाय, रस्त्यावर रिफ्लेक्टर्स, आपत्कालीन रुग्णवाहिका आणि क्वीक रिस्पॉन्स यंत्रणांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गचा हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधनही वाचणार आहे.



समृद्धी महामार्गाचा प्रवास सोपा नव्हता. जमीन संपादन, पर्यावरणीय समतोल आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागल्या. काही ठिकाणी स्थानिकांचा विरोधही झाला, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या आव्हानांवर मात करत अखेर समृद्धी महामार्ग पूर्ण केलाच.


हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एक महत्त्वाचा टप्पा आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा २०२२ मध्ये खुला झाला आणि आता २०२५ मध्ये संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला होत आहे.त्यामुळे राज्यातले १० जिल्हे आणि २७ तालुके जोडले गेले आहेत. याचा फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठीही होणार आहे. लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि रोजगाराला मोठी संधी मिळणार आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक नवा अध्याय आहे. हा रस्ता केवळ दोन शहरांना जोडत नाही, तर विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत समृद्धीचा सेतू बांधतो. यामुळे व्यापार, पर्यटन आणि लॉजिस्टिक्सला नवं बळ मिळणार आहे. ५ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि हा क्षण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे.

Comments
Add Comment