स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी हे महायुती म्हणूनच लढवतील. अपवादात्मक ठिकाणी महायुतीतील पक्ष फ्रेंडली फाईट अर्थात मैत्रिपूर्ण लढती लढतील, असे संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेमतेम चार महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये महायुतीमधील पक्ष एकत्र लढले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही महायुतीतील घटक पक्ष व्यवस्थित नियोजन करण्यात गुंतले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीवेळी इंडी आघाडीने राज्यातील बहुसंख्य जागा जिंकल्या. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. महायुतीने राज्यात दणदणीत विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाच्या आहेत. भाजपाचे मुख्य लक्ष्य मुंबई महापालिका आहे. सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेली मुंबई ही देशातली पहिल्या क्रमांकाची महापालिका सध्या प्रशासकांच्या नियंत्रणात आहे. याआधी मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. भाजपाने मागच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपुढे तगडे आव्हान उभे केले होते. यामुळे आता काय होणार ? याकडे अनेकांचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिउबाठापुढे भाजपाचे तगडे आव्हान आहे.
काही दिवसांपूर्वी उद्धव आणि राज युती करणार अशी चर्चा निवडक प्रसारमाध्यमांमधून रंगवली जात होती. पण आता ही चर्चा थांबली आहे. पुण्यात दोन्ही पवार गट एकत्र येतील अशीही चर्चा आहे. पण प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर कोणता राजकीय पक्ष काय खेळी करतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.