जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
आपल्याला एकदा परमेश्वर समजला की, आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. आज जगाकडे, स्वतःकडे, कुटुंबाकडे पाहण्याची दृष्टी इतकी विकृत, इतकी चुकीची झालेली आहे की सगळेच चुकत गेले. याचे कारण काय? माणसाचा दृष्टिकोन चुकला. ज्याला आपण अध्यात्म, परमार्थ म्हणतो तिथे आधी शुद्ध हा शब्द घातला पाहिजे, शुद्ध अध्यात्म, शुद्ध परमार्थ करणारे लोक आज किती आहेत हे पाहिले, तर परमार्थ म्हणजे काय हे आपल्या ध्यानात येईल. आपल्या साधुसंतांनी, ऋषीमुनींनी सर्व सांगितलेले आहे, पण त्यांनी जे सांगून ठेवलेले आहे ते आपल्या ध्यानात येत नाही. त्यांनी ते फक्त परमार्थाच्या अंगाने सांगितले.
व्यवहाराच्या अंगाने न सांगितल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की, जीवनात व्यवहार महत्त्वाचा आहे हे लक्षात आले नाही. जीवन जगायचे असेल, तर व्यवहार हा हवाच. जीवनात काय करावे? किती करावे? जीवनांत किती गुंतावे? किती गुंतू नये? गुंतणे म्हणजे काय? असे सर्व विषय येतात. माझ्या दृष्टीने व्यवहार महत्त्वाचा आहे. परमार्थ परमार्थ करत गुहेत जाऊन बसलात तरी अन्न, वस्त्र पाहिजे की नाही. “ जरी झाला संन्यासी, बारा वाजता तोंड वासी.’’ संन्यासी झाला तरी कुणीतरी अन्न आणून दिले पाहिजे किंवा कुणाकडे तरी आपण जाऊन मागितले पाहिजे. “भिक्षापात्र घेणे जळो जिणे लाजिरवाणे’’ असे संतवचन आहे.
संन्यासी होणे व भिक्षा मागणे हे जीवनविद्येला मान्य नाही. संन्यास घ्यायचाच कशाला? बायका मुले काय वाईट आहेत? संसार काय वाईट आहे? तुम्ही काही लोकांची मला नावे सांगाल, पण त्यांची नावे घेण्याचीही आपली लायकी नाही. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांची नावे घेण्याचीही आपली पात्रता नाही. ते अपवादच मानायचे. त्यांनी संन्यास घेऊन काय सांगितले ते पाहा.
स्वामी विवेकानंदांची प्रवचने ऐका. त्यांची पुस्तके वाचा मग त्यांनी काय सांगितले ते तुमच्या लक्षांत येईल. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून परमेश्वर हा सर्वात महत्त्वाचा आहे. परमेश्वराचे रूप व स्वरूप हे एकदा समजले व उमजले की सर्व गोष्टी स्पष्ट होतात. जीवनात कसे जगावे हे परमेश्वर आपल्याला शिकवत असतो. आपला खरा गुरू तोच आहे. खरा गुरू हा परमेश्वर आहे असे सांगितले तर लोक अचंबित होतात पण बारकाईने पाहिले, तर परमेश्वराकडून आपल्याला शिकण्यासारखे खूप आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो अस्तित्वात असून सुद्धा त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. कारण तो कधीच मी मी म्हणत नाही. या जगात मी मी म्हणणारे लोकं खूप आहेत. आपण कुणीतरी विशेष आहोत या रुबाबात वावरणारे लोक ९९.९९ टक्के आहेत. नम्र वागणारे जे असतात त्यांना अगदी पूर्ण जरी नाही तरी बरेचसे कळलेले असते.