भगवंताला शरण जावे

अध्यात्म ब्रह्मचैतन्य : श्री गोंदवलेकर महाराज


,मी जे-जे करतो ते-ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते; याकरिता, कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे.


भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही, तर त्याला पापी कसे म्हणावे? जो काळ भगवंत स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वत:ला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वत:ला विसरू? मला सगुणांत प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत सगुणभक्ती करावी. गुरूच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली? यामध्ये अभिमान अनासाये मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधूनमधून वर काढतेच, पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही, की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली, तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे? ‘मी देही नाही’ असे म्हणत राहिला, तर माणूस केव्हातरी देहातीत होईल.


आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक, दोघेही प्रपंच करतात; पण प्रापंचिक, कर्तेपणा आपल्याकडे घेतात, तर संत ‘राम कर्ता’ असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत, तर सुखदु:ख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वत:ला विसरतो, मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार? तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते. ‘किती दिवसांत मुक्ती मिळेल?’ याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ‘ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वत:ला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल.’ स्वत:ला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे.


कृती करणाऱ्याचाच वेदान्त खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचेसुद्धा प्रेम जर वाढते, तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे.


तात्पर्य : देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत, म्हणून नाम घेत, तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल.

Comments
Add Comment

संत कबीर

पंडित होय के आसन मारे पंडित होय के आसन मारे, लंबी माला जपत है। अंतर तेरे कपट करतनी, सो भी साहब लिखता है ।। - डॉ.

महर्षी याज्ञवल्क्य 

भारतीय ऋषी वैशंपायनांच्या आश्रमातून सांजसमयी बाहेर पडलेले याज्ञवल्क्य पूर्ण रात्रभर चालतच होते. अरुणोदयाच्या

सत्संग : अंतर्मुखतेकडून आत्मोन्नतीकडे

प्राची परचुरे वैद्य मानवी जीवन हे केवळ भौतिक गरजांच्या पूर्ततेपुरते मर्यादित नसून ते विचार, मूल्ये, भावना आणि

तृतीयपंथियांचा आक्रोश

ऋतुराज ऋतुजा राजेश केळकर अचानक एक बाळाचा आक्रोश हवेत पसरला आणि सगळे थरारले. तिसऱ्या मजल्यावरील बंद घरातून तो

आत्मबोधाचा शाश्वत आनंद

अर्चना सरोदे मातेच्या गर्भात असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा हा जीव

संत निळोबाराय

नाही त्या उरले दुजे ने कृष्णवीण। बाह्य अंतःकरण कृष्ण झाला ॥ जीवाचाही जीव शिवाचाही शिव । देही देहभान कृष्ण झाला