देवर्षी नारद

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी


देवर्षी नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात भक्तीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. आजही त्यांच्या भक्तिसूत्राचा रसिक अभ्यासक मोठ्या आवडीने अध्ययन करतात. भगवंताचा विसर पडणे म्हणजेच स्वतःला कर्ता मानणे आणि ज्यावेळी कुठल्याही कर्माचे कर्तृत्व माणूस स्वतःकडे घेतो त्यावेळी अहंकार, मोह हे सर्व विकार त्या पाठोपाठ येतातच. आपले प्रत्येक कर्म ईश्वरार्पण करणाऱ्याने कितीही मोठमोठी कामे केली तरी तो त्यात अडकत नाही आणि भक्त स्वतःबरोबर जगाचाही उद्धार करतो, असे वर्णन नारदमुनींनी केले आहे.


चित्रकेतू नामक राजाला पुत्रशोक झाला असता नारदांनी जी अध्यात्मविद्या सांगितली तिला नारदसंहिता म्हणतात. नारदांना सर्व विद्या अवगत होत्या पण सर्वश्रेष्ठ ब्रह्मविद्येची त्यांना आवड होती. तरी नारदांच्या व्यक्तिमत्त्वात मिश्किल मनमोकळेपणाची किनार आहे. श्रीकृष्णांचा सोळा हजार आठ स्त्रियांशी विवाह झाला, तेव्हा या सर्व स्त्रियांना श्रीकृष्ण कसा उचित समय देत असतील, हे बघायला नारदमुनी द्वारकेला आले होते, तेव्हा त्यांना त्या त्या प्रत्येक ठिकाणी देवर्षींना, भगवान श्रीकृष्ण आपल्या भार्येसह प्रसन्नतेने वार्तालाप करताना, कुठे मुलांना खेळविताना, कुठे यज्ञ करताना, तर कुठे ब्राह्मणांना भोजन घालताना अशा गृहस्थाश्रमाच्या रूपात दिसले!! भगवंतांच्या योगमायेचा तो अपूर्व प्रभाव पाहून देवर्षी नारद आश्चर्याने थक्क झाले. असे वर्णन भागवतात आहे. द्रौपदीशी पाच पांडवांचा विवाह झाला, तेव्हा देवर्षी नारदांच्याच सल्ल्याने पांडवांनी असा नियम केला होता की, द्रौपदी प्रत्येक पांडवाच्या महाली एक-एक वर्ष राहील, त्या वर्षात ती ज्याच्याकडे असेल तो द्रौपदीसह एकांतात असताना जर दुसऱ्या पांडवाने त्या दोघांना पाहिले, तर त्या पाहणाऱ्याला बारा वर्षे वनवासात जावे लागेल. या नियमामुळे द्रौपदीवरून पाचही पांडवात कधी वितुष्ट आले नाही. पांडवांनी इंद्रप्रस्थात आपले राज्य स्थापन केले तेव्हा देवर्षी नारदांनी युधिष्ठिरास राजधर्माचा उपदेश करून पांडवांच्या या राज्याची द्वाही भारतवर्षात पसरविण्यासाठी राजसूय यज्ञ करण्याचा सल्ला दिला.


महाभारतयुद्धाअखेरीस अश्वत्थाम्याने जेव्हा पांडवांच्या निद्रिस्त पुत्रांना ठार केले तेव्हा त्यांना पकडून शिक्षा करण्यासाठी भीमार्जुन त्याच्या मागे धावले त्यावेळी अश्वत्थाम्याने त्यांच्यावर ब्रह्मास्त्र सोडले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी अर्जुनानेही ब्रह्मास्त्र सोडले. दोघांची दिव्यास्त्रे एकमेकांवर येऊन आकाशातून अग्नीच्या भयंकर ठिणग्या पडू लागल्या. त्यात सर्व विश्वच होरपळते का, अशी परिस्थिती निर्माण झाली. ते पाहून महर्षी व्यास पुढे होऊन त्या दोन्ही अस्त्रांच्या मध्ये उभे राहिले. जगतकल्याणाचे व्रत अखंड चालविणारा तो महात्मा जगाला जाळणारी ती दोन्ही अस्त्रांची आग स्वतःवर घेऊ लागला! त्याचवेळी अखिल विश्वाच्या कल्याणाची कळकळ असलेले देवर्षी नारदही तेथे येऊन तेही महर्षी व्यासांच्या जोडीला उभे राहिले. या प्रसंगाचे महाभारताच्या सौप्तिकपर्वात पुढीलप्रमाणे वर्णन आहे,


तौ मुनी सर्वधर्मज्ञौ


सर्वभूतहितैषिणौ।


दीप्तयोरस्त्रयोर्मध्ये स्थितौ परमतेजसौ ।


।सौप्तिकपर्व अ.१४.१३


संपूर्ण धर्माचे ज्ञाते तसेच समस्त प्राणिमात्रांचे हितचिंतक असे ते दोघे परम तेजस्वी मुनी अश्वत्थामा आणि अर्जुन यांनी सोडलेल्या प्रज्वलित अस्त्रांच्या प्रदिप्त अग्नीमध्ये उभे राहिले. त्या दोघा श्रेष्ठांना पाहून अर्जुनाने आपले ब्रह्मास्त्र त्वरित मागे घेतले. या एका प्रसंगावरूनही देवर्षी नारदांचे माहात्म्य आपल्या पूर्ण ध्यानी येते. त्यांना आपण वंदन करू या.


(उत्तरार्ध)

Comments
Add Comment

मानवी संस्कृती

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज जगात जे काही चाललेले आहे ते सर्वकाही संस्कारांमुळे चाललेले आहे. अनिष्ट

आत्मशांती

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि गोंधळलेल्या जगात ‘शांती’ हा शब्द जरी सहज

प्रपंच करावा नेटका

ऋतुराज : ऋतुजा केळकर प्रपंच हे वन, मोहाचे काटे दाटती । ध्यान दीप उजळे, अंधारे सारे हटती ॥ गुरुनाम फुले, सुवास

समाधी साधन संजीवन नाम

भारतीय संत : डॉ. अनुराधा कुलकर्णी श्रीज्ञानेश्वरांच्या पुढील अभंगाचा अर्थ-भावार्थ पाहू या..... समाधि साधन संजीवन

ठरलं तर ! इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात होणार 'या' महाराजांचे कीर्तन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार

श्रद्धा की अंधश्रद्धा?

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या घडणीत ‘श्रद्धा’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.