पुणे: वारकरी संप्रदायांच्या महत्वाच्या स्थानांपैकी एक असलेल्या देवाची आळंदी देवस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आळंदी नगरपरिषदेने दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, आळंदीत इंद्रायणीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच मावळ भागातही पावसाचा जोर कायम आहे. आळंदी आणि परिसरातही संतत धार सुरू आहे. याचा परिणाम इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली असून, पुराचे पाणी भक्ती सोपान पुलावरून वाहत आहे. तसेच इंद्रायणी काठच्या पुंडलिक मंदिरात पाणी शिरले आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी इंद्रायणी काठी पाहणी करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. इंद्रायणी नदीकाठच्या दगडी घाटावर पाणी वाहत असल्याने कोणत्याही नागरिकांनी पाण्यात उतरू नये. तसेच स्थानिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पुरपरिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी, आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आणि वेळोवेळी परिस्थितीची सूचना देण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ध्वनिक्षेपण देखील लावण्यात आले आहेत.
पुण्यात पावसाचा रेड अलर्ट
पुण्यात मंगळवारीसुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे शहर, जिल्हा आणि घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्यातून वर्तवण्यात आलं आहे.