मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी मुंबई आणि पंजाब यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाबने मुंबईला ७ विकेटनी हरवले. या विजयासह पंजाब किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांचे १९ गुण आहेत. तर मुंबईचा संघ चौथ्या स्थानावरच राहणार आहे. टॉप २मध्ये पोहोचण्याच्या आशा संपल्या आहेत. मात्र या सामन्यानंतर प्लेऑफच्या समीकरणामध्ये मोठा बदल झाला आहे.
जाणून घ्या प्लेऑफचे गणित
प्लेऑफसाठी ४ संघांनी क्वालिफाय केले आहे. पहिल्या स्थानावर १९ गुणांसह पंजाब किंग्स आहे तर दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. त्यांचे १४ सामन्यांत १८ गुण आहे. तिसऱ्या स्थानावर आरसीबीचा संघ आहे. त्याने १३ सामन्यांत १७ गुण आहेत तर १४ सामन्यांत मुंबईचे १६ गुण आहेत. म्हणजेच प्लेऑफसाठी क्वालिफाय केलेल्या ३ संघांनी आपापले १४ सामने खेळले आहेत. केवळ आरसीबीचा एक सामना शिल्लक आहे.
आरसीबीसाठी काय आहेत अडचणी
जर आरसीबीच्या संघाने लखनऊला हरवले तर त्यांचे १९ गुण होतील आणि ते टॉप २मध्ये येतील. तर गुजरात आणि मुंबई तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहतील आणि एलिमिनेटर खेळतील. मात्र आरसीबीने हा सामना गमावला तर ते तिसऱ्याच स्थानावर राहतील आणि एलिमिनेटर राऊंडमध्ये खेळतील. म्हणजेच आरसीबीकडे लखनऊविरुद्ध मोठी संधी आहे.
पंजाब आणि मुंबई यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १८४ धावा केल्या होत्या. त्यानंतर पंजाबला १८५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. याला प्रत्युत्तर देताना पंजाबच्या प्रियांश आर्य आणि जोस इंग्लीश यांनी तुफानी खेळी करताना हा सामना ७ विकेटनी जिंकला.