नाशिक : आताच्या काळात सर्वच प्राध्यापकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय शिकण्याची तयारी ठेवावी व त्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी करावा. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. "कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा विषय सर्व शैक्षणिक संस्थांनी समाविष्ट करणे, काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सौराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. हितेश शुक्ला यांनी केले.
मविप्रच्या आयएमआरटी महाविद्यालयात एआयएमएस यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवशीय ९ व्या एआय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्रचे उपसभापती डी. बी. मोगल होते. यावेळी डॉ. शुक्ला म्हणाले, व्यवसाय सुरू करून नफा मिळविण्यासाठी त्यांनी एआयच्या वापरासह अनेक युक्त्या सांगितल्या. नाशिकचा कांदा ७५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करून गुजरातमधील महुआ येथे पोहोचतो. तिथे तो मोठा वाहतूक खर्च सहन करून ड्रायरमध्ये कोरडा केला जातो. कांद्याची भुकटी आखाती देशांत १०० पट किंवा त्याहून अधिक दराने निर्यात केली जाते. यातून गुजरात प्रचंड नफा कमावते. महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना नैतिक मार्गाने श्रीमंत बनविण्याचा दृष्टिकोन का विकसित केला नाही? विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी यासाठी अभ्यासक्रम का विकसित केले नाहीत? असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. आयएमआरटीचे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात बदलत्या काळानुसार एआयचे महत्त्व सांगितले. त्यांनी राष्ट्रीय परिषदेचे महत्त्व आणि नवीन अभ्यासक्रमांची माहितीही दिली.
एआयवरील दोन दिवसांतील आठ सत्रांतील निष्कर्ष अहवाल वाचन संयोजक डॉ. संजय आ. गायकवाड यांनी केले. केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी एआयचा प्रत्यक्ष वापर समाज व राष्ट्राच्या कृषी विकासासाठी किती गरजेचा आहे, हे सांगितले. या परिषदेत देशभरातील तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि मान्यवर सहभागी झाले व विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. याबद्दल मविप्र संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे यांनी आयएमआरटीच्या राष्ट्रीय परिषद आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. प्रा. हर्षल देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात विश्वास देवकर यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची सांगड मानवी मनावर त्याचे होणारे परिणाम व त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या’ यावर मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी मनावर ती राज्य करू शकणार नाही परंतु काही प्रमाणामध्ये मानवी भावनांमध्ये हस्तक्षेप करू शकेल, असे म्हटले.
परिषद यशस्वीतेसाठी डॉ. जयश्री कदम, डॉ. दीपक नांद्रे, डॉ. प्रवीण रायते, वैशाली कदम, प्रा. राहुल ठाकरे, डॉ. जी. एम. अहिरे व डॉ. वर्षा भाबड, प्रा. सीमा जाधव व प्रा. राजश्री वडघुले यांनी वेगवेगळ्या सत्रांचे सूत्रसंचालन केले.