मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो नागरिक उपचाराकरिता येतात. अशा रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब आणि बालक यांची देखील भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्यच्या वतीने दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते.
मुंबईतील 'अक्षय चैतन्य' या सेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई पोर्ट अथॉरिटीने भायखळा येथील घोडपदेव येथे ३०,००० चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे, ज्याठिकाणी भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वांत अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर विकसित केले जाणार आहे.
या अत्याधुनिक किचनमध्ये दररोज १,००,००० गरजूंना पौष्टिक आहार पुरवण्याची क्षमता असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मुंबई पोर्ट अथॉरिटीचे मुख्य अग्निशमन अधिकारी इंद्रजित बड्डा, मुंबई पोर्ट अथॉरिटीचे इस्टेट मॅनेजर जी. ए. शिरसाट मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचे दिलीप शेडकर टीएलसी लीगलचे मॅनेजींग पार्टनर विपिन जैन, व्हीव्हीएफ ग्रुपचे सीएमडी रुस्तम गोदरेज जोशी, महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय शेडे आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे अमित नबीरा आदी या उपक्रमाला उपस्थित होते.