मुंबई : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी बेस्टने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सहपालकमंत्री ॲड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर श्रीनिवास आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील नागरिकांना प्रवास करताना जास्त ताटकळत थांबावे लागू यासाठी नियोजन करावे. बसची संख्या वाढविण्यासोबत बस किती वेळात येणार, सध्या कुठे आहे, याची माहिती प्रवाशांना होण्यासाठी यंत्रणेची त्वरित अंमलबजावणी करावी. बांद्रा, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. मुंबईतील छोटे, अरूंद रस्ते पाहता अत्याधुनिक छोट्या बस घ्याव्यात. यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या एन कॅपच्या (नॅशनल क्लिन एअर पॉलिसी) निधीचा वापर करावा; असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईमध्ये लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल आणि बससाठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची प्रणाली तयार होत आहे. यातून नागरिकांना एकाच तिकिटामध्ये प्रवास करता येणार असल्याने बेस्टला याचाही फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाच बस डेपोच्या ठिकाणी मराठी सिनेमा थिएटर
बस डेपोंचा पुनर्विकास करताना करमणूक केंद्राचाही विचार करण्याबाबत मंत्री श्री. शेलार यांनी सूचना केल्या. मराठी सिनेमाला उर्जितावस्था येण्यासाठी पाच ठिकाणी मराठी सिनेमा थिएटरची निर्मिती केल्यास यातूनही उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मनपाच्या बजेटमध्ये निधीची तरतूद
बेस्टवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी मुंबई महापालिका मदत करते. मात्र मनपाच्या बजेटमध्ये तीन टक्के वाहतुकीसाठी राखीव तरतूद केली तर याचा बेस्टला फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी बेस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास यांनी टोल माफीची आणि कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटीची १६५८ कोटी मिळावेत, अशी मागणी केली. सरकारी कर माफ करण्याचीही मागणी त्यांनी केली. याबाबत प्रस्ताव सादर करावेत, शासन याचा सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
छोट्या गाड्यांचा प्रस्ताव तयार करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, फेरीवाल्यांमुळे रस्ते अरूंद होत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो स्टेशन आणि बेस्ट बसच्या मार्गाचे नियोजन करावे. यासाठी छोट्या अत्याधुनिक बसचा प्रस्ताव तयार करावा. नागरिकांच्या करानुसार सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. मुंबई शहरात बेस्टच्या विविध ठिकाणी जागा आहेत, त्यातूनही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत; असे ते म्हणाले.
बेस्टच्या वातानुकूलित बसचे उद्घाटन
बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईसाठी २१०० वातानुकूलित बसची खरेदी केली असून यातील ५०३ बस मिळाल्या असून आणखी २४०० बस मागविण्यात येणार असल्याची यावेळी माहिती देण्यात आली.
जीपीएससाठी गुगलशी करार
प्रवाशांना सध्या बस कुठे आहे, किती वेळात येईल, यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यासाठी जीपीएस सिस्टीमचा उपयोग होणार आहे. यासाठी बेस्ट गुगलशी करार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बेस्ट बसची स्थिती
सध्या बेस्टकडे २७८३ बस; यामध्ये ८७५ इलेक्ट्रीक बस
लोकसंख्येच्या तुलनेत सात हजार बसची आवश्यकता
रिक्षा, मेट्रो, टॅक्सीपेक्षा कमी भाडे; भाडेवाढीची मागणी
२०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रीक करण्याचा बेस्टचा मानस
अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…
मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…
मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…
मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर…
AC Compressor Summer Care: उन्हाळा सुरु होताच एसी कंप्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येतात. पण…