Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

पतीशी झालेल्या वादातून मातेने दोन छकुल्यांसह घेतली खाडीत उडी

पतीशी झालेल्या वादातून मातेने दोन छकुल्यांसह घेतली खाडीत उडी

तिर्लोट- आंबेरी पुलावरून केली आत्महत्या : देवगड हादरले


गावावरुन मुंबईला घेऊन चला ... मुंबईला असलेला पतीला केला शेवटचा फोन


देवगड : पती -पत्नीमधील भांडण विकोपाला गेले अन रागाच्या भरात पतीपासून तीने कायमचेच दुर होण्याचा निर्णय घेतला. आपल्या २ लेकरांना छातीशी घेत तीने पुलावरून खाडीत झोकून दिले. या घटनेने देवगड तालुका हादरला आहे. देवगड तालुक्यातील तिर्लोट- आंबेरी पुलावरून दोन लहान मुलांसह मातेने खाडीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. श्रीशा सुरज भाबल (२४),श्रेयश (५) व दुर्वेश (४) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना १७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. पतीशी झालेल्या किरकोळ वादातून श्रीशा हिने मुलांसमवेत आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिर्लोट- आंबेरी येथील सुरज सुहास भाबल यांच्याशी श्रीशा हिचा २२ जून २०१८ रोजी विवाह झाला. श्रीशाचे माहेर कर्नाटक रायचूर येथील असून ती आई वडिलांसमवेत कल्याण येथे राहत होती. तिचे पती सुरज भाबल हे नोकरीनिमित्त मुंबई दादर येथे राहत असून रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली होती. श्रीशा ही तिचे मुलगे श्रेयश व दुर्वेश यांच्यासमवेत सासरी तिर्लोट आंबेरी येथे सासरे सुहास शिवराम भाबल, सासू सुहासिनी, दीर मिलींद यांच्यासमवेत राहत होती. १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास श्रीशा हिने आपल्या पतीशी फोनवरून मुंबईला घेवून जाण्याबाबत बोलत होती. परंतु पती सुरज याने मुंबई येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने तीला मुंबईला घेवून जाण्याबाबत नकार दिला. यावेळी रागाने श्रीशाने सासू व सासरे यांना न सांगता त्याच सायंकाळी ५.४५ वा. मानाने दोन्ही लहान मुलांना घेवून घरातून निघून गेली. तीचा आजूबाजूला शोध घेवूनही ती मिळाली नाही. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास आंबेरी जेटीजवळ श्रीशाचा मृतदेह आढळून आला. तसेच तेथीलच पिराचे पोय याठिकाणी श्रेयशचा मृतदेह सापडला. तर दुर्वेशचा मृतदेह १७ एप्रिल रोजी दुपारी आंबेरी खाडीपात्रातच कातळी किनारी सापडला.



घटनेची माहिती श्रीशाचे सासरे सुहास भाबल यांनी विजयदुर्ग पोलिस स्थानकात दिली. देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी घनःश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलिस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण, पोलिस हवालदार प्रशांत जाधव, सुनिल पडेलकर, पो. कॉ. बाबाजी कांदे, प्रशांत गावडे, महिला पोलिस वनिता पडवळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी तेथील रामकृष्ण जुवाटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष कुलदीप लिंगायत, पोलीस पाटील अमित घाडी उपस्थित होते. विजयदुर्ग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment