पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची (Mumbai News) बातमी समोर आली आहे. येत्या मंगळवारी मुंबईतील काही भागात जलवाहिन्यांच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा, तसेच पुढील काही दिवस पाणी उकळून प्या, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Water Cut)
Mumbai Dabbawala : मुंबईचा डबेवाला चालला सुट्टीवर! नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार,एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथील ६०० इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी जुनी झाली आहे. या कारणाने जुनी जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ‘एच पूर्व’ विभागातील वांद्रे – कुर्ला संकूल परिसरामध्ये मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे. सायंकाळी ५ ते ७.३० या कालावधीतील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
या जलवाहिनी विषयक कामकाज झाल्यानंतर एच पूर्व विभागाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा खंडित कालावधीत काटकसरीने पाणी वापर करावा. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Mumbai Water Supply)