BMC : झोपडपट्टी परिसरात पाण्याची उधळपट्टी!

राखीव पाणीसाठा वापरण्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेची मागणी


मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) राज्य शासनाकडे राखीव पाणीसाठा वापरण्याची मागणी केली आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान जलवाहिन्यांना गळती लागून शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. अशातच अनेक झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरू असून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.


झोपडपट्टी भागातील अनेक गल्ली - बोळांमधील जलवाहिन्यांना बूच लावण्यात येत नसल्यानेही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. अनेकदा चिंचोळ्या गल्ल्या आणि प्रत्येक बोळांमध्ये लक्ष ठेवणे महापालिकेला शक्य होत नाही. अशी प्रकरणे निदर्शनास येत नसल्याने संबंधितांवर कारवाई होत नाही.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमध्ये पाणीसाठा ३५ टक्क्यांखाली गेला आहे. वातावरणातील उष्म्यामुळे मुंबईकरांची पाण्याची गरजही वाढली आहे. मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी पालिकेने राज्य शासनाकडे राखीव पाणीसाठा वापरण्यासाठी विनंती केली आहे. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणादरम्यान दररोज जलवाहिन्या फुटण्याच्या छोट्या- मोठ्या घटना घडत असून त्यातूनही पाण्याची नासाडी होत आहे. कमी दाबाने पाणी येणे, अपुरा पाणीपुरवठा आदी समस्येमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी विशेषत: झोपडपट्टी परिसरात पाण्याचा अपव्यय होत आहे.


विकासकामे, मेट्रो प्रकल्प, जलवाहिन्या बदलण्याची कामे आदी विविध कामांमुळे दररोज जलवाहिन्यांना गळती लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी होते. तसेच महापालिकेच्या कामगारांनाही जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. त्यातच दररोज फुटणाऱ्या जलवाहिन्यांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. झोपडपट्टी आणि अन्य परिसरात विनाकारण होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध कारणांमुळे दररोज होणारा पाण्याचा अपव्यय सुरूच राहिल्यास मुंबईकरांची पुरेशा पाण्याअभावी गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे.



वाहत्या पाण्यातच कामे


झोपडपट्टी भागातील अनेक घरांमध्ये वाहत्या पाण्यात कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे आदी दैनंदिन कामे केली जातात. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर होतो. तसेच, अनेक गल्ली-बोळांत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बंद केल्या जात नाहीत. विनाकारण हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. महापालिकेतर्फे झोपडपट्टीतील प्रत्येक घरात २२५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, नागरिकांच्या चुकीच्या सवयींमुळे प्रमाणापेक्षा अधिक पाणी वाया जाते. जलवाहिन्यांना बूच, व्हॉल्व्ह न बसवण्याच्या घटनांमध्ये वापरकर्त्यांवर पाण्याची नासाडी केल्याप्रकरणी कारवाई केली जाते. मात्र, झोपडपट्टी भागातील चिंचोळ्या गल्ल्या आणि बोळांमध्ये लक्ष ठेवणे पालिकेला शक्य नसल्याने संबंधितांवर कारवाई होत नाही.

Comments
Add Comment

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला

Nitesh Rane : जळगाव जामोदमध्ये फिशिंग क्लस्टर उभारणीसाठी सकारात्मक प्रयत्न; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक फिशिंग क्लस्टर विकसित