उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस धावणार

मुंबई (प्रतिनिधी) : शाळांना सुट्टी लागल्यावर चिमुकल्यांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सध्या परीक्षा सुरु असल्या तरी त्यानंतर लागणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचे प्लॅनिंग आतापासूनच झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील परिवहन मंडळही सज्ज झाले असून यंदा गावी जाणाऱ्यांना ‘सरप्राईज’ देण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्याची तयारी पूर्ण केली आहे. राज्यभरात एकूण ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळाने पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावी जाणाऱ्यांचा प्रवास गारेगार होणार हे निश्चित.

उत्पन्नात भर पडणार

उन्हाळी सुट्टीदरम्यान मुंबई आणि उपनगरांमधून कोकण तसेच राज्याच्या इतर भागांत जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक असते. एकीकडे रेल्वेने अतिरिक्त सेवा सुरू केली तरी राज्याच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवासी ‘लाल परी’ला पसंती देतात. अनेक गावांमध्ये जाण्यासाठी एसटी बसशिवाय इतर पर्यायच नाही अशीही स्थिती आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करुन प्रवाशांचा कल एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकू शकतो, या अनुषंगाने महामंडळाने एप्रिल आणि मे महिन्यात ७८२ वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठे कुठे सोडल्या जाणार या एसी गाड्या ?

नव्या धोरणानुसार सोडण्यात येणाऱ्या एसी बस या मध्यम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश असणार आहे. मुंबई सेंट्रल व परळ आगारातूनही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिवशाही बसची सेवा मुंबईतून राज्यभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव, बीड, नागपूर, अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. उन्हाळी सुट्टीत खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून भरमसाट पैसे उकळतात. अशा परिस्थितीत अनेक प्रवासी एसटी बसेसकडे वळतात. त्यामुळे अतिरिक्त शिवशाही बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लवकरच २६४० नवीन एसी गाड्या

एसटी महामंडळाच्या ताफ्यात नजीकच्या काळात २६४० नवीन ‘लाल परी’ गाड्या दाखल होणार आहेत. दर महिन्याला ३०० गाड्या अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने नवीन एसी लाल परी प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. राज्याच्या खेड्यापाड्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पाश्र्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वातानुकूलित बसेसकडे वळत आहेत. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेत उन्हाळी सुट्टीत ८७२ शिवशाही बसेस प्रवासी सेवेत धावणार आहेत. तसेच जादा लाल परी गाड्या सोडण्याचेही नियोजन केले जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी दिली आहे.
Comments
Add Comment

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग