मुंबई : मुंबईच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढलेले तापमान व वाढत असलेली आर्द्रता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उन्हाचा असह्य त्रास मुंबईकरांना होत आहे. दरम्यान, रविवार, सोमवार आणि मंगळवारी सलग तीन दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाचा ताप, तसेच उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सकाळी वातावरणात जाणवणारा गारवा, दुपारी होणारी लाही असा तापमानामधील विचित्र बदल मुंबईकर अनुभवत आहेत. वाढत्या तापमानाची ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवार, सोमवार, मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर हैराण झाले होते. आता रविवारपासून मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अवघ्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाट येत आहे. यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी मुंबईचे कमाल तापमान ३७ ते ३८ अंशांदरम्यान असण्याचा आणि किमान तापमानही वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मार्च महिन्यात ऋतू बदलतो. या काळात दरवर्षी उष्णतेच्या कमी – जास्त तीव्रतेच्या लाटेची शक्यता असते. मुंबईमध्ये वर्षभरात सरासरी ३१ दिवस उष्णतेच्या लाटा येतात. फेब्रुवारी ते ऑक्टोबर दरम्यान वेगवेगळ्या दिवशी या लाटा येतात. यामुळे उष्णतेची लाट येणे ही सामान्य बाब आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शक्यतो सकाळी ते संध्याकाळी चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळा. बाहेर पडायचेच असेल तर अंगभर कपडे अथवा मोजे, हातमोजे, गॉगल, टोपी किंवा छत्री, चेहऱ्याला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून गमछा किंवा ओढणी (दुपट्टा) अथवा स्कार्फ वापरा. शक्यतो पांढऱ्या रंगाचे सैल सुती कपडे वापरा. काळ्या रंगाचे किंवा कोणतेही गडद रंगांचे (डार्क कलर) कपडे वापरणे टाळा. बाहेर पडताना सोबत पिण्यासाठी अर्धा ते एक लिटर पाणी बाळगा. दिवसभरात अधूनमधून पाणी, नारळपाणी, ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत पिऊन शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवा. तब्येत बिघडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.