नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताचा उपांत्य फेरीचा सामना ऐन रमझानच्या दिवसांत आला. रमझानमध्ये मुसलमान दिवसा उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्रदर्शन घेऊन रोझा सोडतात. रमझानचा उपवास सुटेपर्यंत मुसलमान सरबत, एनर्जी ड्रिंक, ज्यूस यांचेही सेवन करत नाहीत. पण मोहम्मद शमी या भारतीय क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुबईत झालेल्या उपांत्य सामन्यावेळी ज्यूस घेतला होता. शमी ज्यूस पीत असताना कॅमेऱ्यात दिसला होता. यामुळे काही मौलाना (मुसलमान धर्मगुरु) नाराज झाले होते. टीव्ही वाहिन्यांना मुलाखती देऊन मौलानांनी मोहम्मद शमीविषयीची त्यांची नाराजी जाहीर केली. पण मौलानांच्या नाराजीविषयी अनेक क्रिकेटप्रेमींनी तसेच मोहम्मद शमीच्या भावाने संताप व्यक्त केला.
‘मुंबई श्री’च्या खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी खानविलकरांचे आर्थिक पाठबळ
राहत्या घरापासून दूर असलेले, प्रवासात असलेले, रुग्ण, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामामुळे ज्यांना रोझा पाळणे शक्य नाही असे नागरिक या सर्वांना रमझानच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. धर्मानेच ही सूट दिली आहे. पण धर्माने दिलेल्या या सवलतीकडे दुर्लक्ष करुन मौलाना मोहम्मद शमीविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया अनेक क्रिकेटप्रेमींनी तसेच मोहम्मद शमीच्या भावाने व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टीने मोहम्मद शमीला पाठिंबा दिला आहे आणि खेळाडूवर रोझा पाळण्याची सक्ती करणाऱ्या मौलानांवर टीका केली आहे.
ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून रमझानमध्ये रोझा न ठेवणाऱ्या मोहम्मद शमीवर टीका केली. शरियतनुसार मोहम्मद शमी दोषी आहे. तो गुन्हेगार आहे; असे मौलाना शहाबुद्दीन रजवी म्हणाले. तर भारतीय जनता पार्टी मोहम्मद शमीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. रोझा ठेवणे किंवा न ठेवणे, विशिष्ट धर्म – परंपरा – चालीरीती यांचे पालन करणे किंवा न करणे हा खासगी विषय आहे. कोणी कोणत्या धर्माचे पालन करावे, कोणते व्रत करावे, कोणती पूजा करावी हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. स्वतःला धर्माचे ठेकेदार समजून कोणी इतरांना समजावण्यास जाणे योग्य नाही; असे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले. कोणालाही धर्मभ्रष्ट करण्याचा अधिकार स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणवणाऱ्यांना नाही. आता काळ बदलला आहे; असेही त्यांनी सांगितले.
क्रिकेटपटू मोहम्मद शमी दुबईत एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, अशी कोट्यवधी भारतीयांची भावना आहे. दुबईच्या वातावरणात खेळताना फिटनेस जपण्यासाठी आवश्यक असल्यास ज्यूस पिण्यात काहीच गैर नाही. पण यात कोणी विनाकारण धर्म आणत असेल तर ते अयोग्य आहे. खेळाडूने स्वतःचा फिटनेस कसा जपावा हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. यावरुन निरर्थक वाद निर्माण करणे अयोग्य आणि अनावश्यक आहे; असे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले.