चंद्रपुरात केले जाणार पर्यायी वनीकरण
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या वर्सोवा ते मिरा रोड भाईंदरपर्यंतच्या विस्तारीत सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोड आणि मढ वर्सोवा पूलांच्या कामांमध्ये तब्बल १०८ हेक्टर कांदळवनाची जमिनी बाधित होत आहे. या कांदळवनाची जमिनी बाधित होत असल्याने चंद्रपूरमधील जागेमध्ये याचे पर्यायी वनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यानच्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) शेवटच्या टप्प्यात असून आता वर्सोवा ते दहिसर आणि पुढे मिरा रोड भाईंदर या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यात वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोड प्रकल्पाचे सहा टप्यात काम हाती घेत कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या सहा टप्प्यातील कामासाठीच जीएसटीसह १८,२६९.७७ कोटी रुपये आणि विविध करासह ही रक्कम ३६,०९५.१९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत मार्गरेषेने बाधित होणारी जमिन ही कांदळवन, खाडी व नैसर्गिक क्षेत्र तसेच अस्तित्वातील रस्त्यामधुन जाते.
तसेच महापालिकेच्यावतीने वर्सोवा ते मढ या सागरी पूलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाची मार्ग रेषा ही विद्यमान रस्ता, विकास नियोजन रस्ता, कांदळवन, खाडी इत्यादीने बाधित होत असल्याने महाराष्ट़ सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, वन विभाग, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आदींची परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे.
त्यामुळे कोस्टल रोड तसेच मढ आणि वर्सोवा या पूलाच्या बांधकामासाठी कांदळवन आणि खाडीची जागा बाधित होत असून या दोन्ही प्रकल्पांमुळे सुमारे १०८ हेक्टर जागा बाधित होत असून या बाधित होणाऱ्या कांदळवनाऐवजी पर्यायी वनीकरणासाठी चंद्रपूरमधील जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या जागेचे मुल्यांकन झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे याच्या जमिनीच्या मुल्याची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.