श्रीशैलम : तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील श्रीशैलममध्ये कालव्यातील पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एका बोगद्याचे काम सुरू असताना दरड कोसळली. यामुळे बोगद्याची दोन्ही बाजूची वाट बंद झाली आणि आठ जण बोगद्यात अडकले. यात दोन अभियंते, जयप्रकाश असोसिएट्सचे चार मजूर आणि अमेरिकेतील कंपनीचे दोन तंत्रज्ञ आहेत. या आठ जणांव्यतिरिक्त आणखी ४२ जण बोगद्यात होते. पण दरड कोसळू लागल्यावर ते ४२ जण धावत बोगद्यातून बाहेर आले. वाट बंद झाल्याने इतर ८ जणांना बाहेर येणे अशक्य झाले.
Pune Crime : छावा चित्रपटाचा पोलिसांना फायदा, दोन मकोका आरोपींना अटक
बोगद्यात अडकलेल्या आठ जणांच्या सुटकेसाठी ढिगारा उपसून मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. मदतकार्य करत असलेले पथक बोगद्यात १३ किमी. आतपर्यंत पोहोचले आहे. अद्याप मदतकार्य करणाऱ्यांना अडकलेल्या ८ जणांपैकी कोणीही दिसलेले नाही.
बाहेर आलेल्या ४२ जणांनी दिलेल्या माहितीआधारे ज्या ठिकाणी सर्वात आधी वाट बंद झाली त्या ठिकाणाजवळ मदतकार्य करणारे पथक पोहोचले आहे. या ठिकाणी पोहोचल्यावर हाका मारण्यात आल्या. पण प्रतिसाद मिळाला नाही. अडकलेले आठ जण बंदीस्त वातावरणात बेशुद्ध पडले असतील अशी शक्यता गृहित धरुन आणखी ढिगारा उपसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अडकलेल्या आठ जणांना शोधून बोगद्याबाहेर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तेलंगणा सरकारचे मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी आणि जे कृष्ण राव हे मदतकार्याचा सतत आढावा घेत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरुन बातचीत झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी मदतकार्याचा आढावा घेतला. लागेल ती मदत पुरविण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना दिले.