महाराष्ट्रातील ६६ तर देशातील ७३ महत्त्वाचे होणार देवदर्शन
मुंबई : राज्य सरकारने ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेट देता यावी यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत मुंबई शहरातील १५०, उपनगरातील २५० अशा एकूण ४०० ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर दर्शनाचा लाभ घेतल्याचे आता समोर आले आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील ६६, तर देशातील ७३ महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांचे मोफत दर्शनाची सुविधा मिळते. यामध्ये महाराष्ट्रातील ६६ तीर्थ स्थळांमध्ये मुंबईतील १५, तर ठाण्याच्या २ तीर्थस्थळांचा समावेश आहे. पात्र व्यक्तीला प्रमुख तीर्थस्थळांपैकी कोणत्याही एका तीर्थयात्रेचा एकदाच लाभ घेण्याची सुविधा मिळते.
पोर्टलवर ऑनलाइन किंवा स्वत: सेतू सुविधा केंद्रात अर्ज विनामूल्य भरता येतो. अर्ज भरताना अर्जदार प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक आहे. फोटो काढून केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते.
प्रत्येक तीर्थस्थळासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड होते. अतिरिक्त लोकांची प्रतीक्षायादी तयार केली जाते.
अर्जदार पती, पत्नीपैकी एकाची निवड झाल्यास जोडीदाराला पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरिय समिती घेते. अर्जदाराचे वय ७५ आणि त्यापुढील असल्यास सोबत जोडीदार किंवा एक सहाय्क प्रवास करू शकतो.
एका टूरसाठी ८०० प्रवासी आवश्यक असल्याने मुंबईतून फक्त अयोध्येत श्रीराम मंदिर दर्शन दूर गेली आहे. यात मुंबई व ठाण्यातून प्रत्येकी ४०० जणांचा समावेश होता. – प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग