मुंबई : महाराष्ट्रात बहुचर्चित, प्रसिद्ध आणि आदर्श असणारी नवरा बायकोची जोडी म्हणजे जेनेलिया आणि रितेश देशमुख. हे दोघेही कायम चर्चेत असतात. आज या दोघांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली असून दोघांनीही सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत एकमेकांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या २२ वर्षांपासून ते एकमेकांसोबत आहेत. ९ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये ते लग्नबंधनात अडकले.
असं पार पडलं महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचं लग्न
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची पहिली भेट २००२ मध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. जेनेलियाने सुरुवातीला रितेशकडे दुर्लक्ष केलं होतं. रितेश हा श्रीमंत घरातील बिघडलेला मुलगा असल्याचं जेनेलियाला वाटायचं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली. 'तुझे मेरी कसम' या सिनेमानंतर त्यांनी 'मस्ती' या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी ते लग्नबंधनात अडकले. सुरवातीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या लग्नाला नकार दर्शवला होता. रितेश-जेनेलायाचं लग्न ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने झालं होतं.
रितेश जेनेलियाने महिनाभर लिहिलेल्या पत्रातून प्रेम घट्ट होत गेलं
माध्यमांशी गप्पा मारताना रितेश देशमुख म्हणाला,"जेनेलिया आणि मी रिलेशनमध्ये असताना आजच्यासारख्या व्हिडीओ कॉलसारख्या गोष्टी नव्हत्या. तसेच आऊटडोर शूटिंगदरम्यान कॉल किंवा मेसेज करणं हे खूप महागात पडत होतं. एकदा माझं न्यूयॉर्कमध्ये शूटिंग सुरू होतं तर दुसरीकडे जेनेलिया दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत होती. त्यावेळी आम्ही एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी पत्र लिहिण्याचं ठरवलं. आम्ही ३० दिवस एकमेकांना पत्र लिहित होतो. आजही आम्ही ते जपून ठेवले आहेत.
दरम्यान 'वेड' सारख्या मराठी चित्रपटातून रितेश आणि जेनेलिया प्रेक्षकांना एकत्र दिसले होते. त्यानंतर आता ते पुन्हा कोणत्या मराठी चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.