एमएमआरमधून थेट मुंबई गाठता येणार
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगरला थेट मुंबई, नवी मुंबईशी जोडणारा महामार्ग तयार करण्याचा मास्टर प्लान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने तयार केला आहे. यामुळे एमएमआरमधून प्रवाशाना थेट मुंबई, नवी मुंबई गाठता येणार आहे.
बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरातून लाखो प्रवासी कामानित्ताने दररोज मुंबईत येतात. रस्ते मार्गे मुंबईत येण्यासाठी थेट कोणताही रस्ता नाही. यामुळे या शहरातून जलद गतीने मुंबईत येण्यासाठी लोकल हा एकमेव पर्याय आहे. मात्र, दिवसेंदिवस या शहराची लोकसंख्या वाढत असल्याने मध्य रेल्वेवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. येथील प्रवाशांची प्रवासाची अडचण दूर करण्यासाठी एमएमआरडीएने जबरदस्त प्लान बनवला आहे. बदलापुर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांना थेट मुंबई, नवी मुंबईशी जोडणारा महामार्ग बांधला जाणार आहे.
Kalyan – Shilphata Road : कल्याण – शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद!
डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या उपनगरांमध्ये झपाट्याने नागरी वसाहती निर्माण होत आहेत. त्यामुळे या शहरातील नागरिंकाना वाहतूक कोंडीची सामना करावा लागतो. हा नवा महामार्ग येथील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. एमएमआरडीएने मर्यादित प्रवेश महामार्गाच्या बांधकामासाठी नुकतीच निविदा काढली. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे. बदलापूरपासून मुंबई-दिल्ली दरम्यान हा महामार्ग सुरू होणार आहे. यामध्ये मुंबई-वडोदरा मार्ग, काटई-बदलापूर आणि कल्याण रिंगरोडचा समावेश आहे. या महामार्गाचा पहिला इंटरचेंज अंबरनाथमधील पालेगावात असणार आहे. तर, दुसरा इंटरचेंज कल्याण पूर्वेतील हेदुटणे मध्ये असेल. यासह बदलापूर इंटरचेंज आणि कल्याण रिंगरोड इंटरचेंज असे चार इंटरचेंज असतील.
हा मार्ग कल्याण रिंग रोड आणि कल्याण शिळफाटा रोडला जोडला जाणार आहे. या महामार्गाची लांबी २० किलोमीटर असेल. यामध्ये तीन बोगदे आणि पाच अंडरपास असतील. हा महामार्ग ८ लेनचा असेल. यात कॅरेजवे आणि सर्व्हिस लेन असणार आहेत.