नवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेत खेळणाऱ्या विराट कोहलीला पाहण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी जमली होती.यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यात पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले. तर काही फॅन्स जखमी झाले आहेत.
रणजी करंडक स्पर्धेत रेल्वेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने १२ वर्षात प्रथमच प्रथम श्रेणी स्पर्धेत मैदानात पुनरागमन केले. आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमबाहेर आले होते. फॅन्स पाहाटे ३ वाजल्यापासून स्टेडियमच्या गेट नंबर १६ समोर उभे होते. तेथील सुरक्षारक्षकांसाठी हे सारं अनपेक्षित होतं. त्यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये काही चाहते जखमी झाल्याने गोंधळ उडाला. हा जमाव एकमेकांना ढकलत होता आणि ज्यामुळे एंट्री गेटजवळ दोन पंखे पडले आणि चाहते जखमी झाले. पोलिसांच्या दुचाकीचे नुकसान झाले आणि अनेकांचे बूट मागे राहिले. या गोंधळात किमान तीन जण जखमी झाले.
Air India Flight : भारत-इस्त्रायल विमानसेवा २ मार्चपासून पूर्ववत होणार
विराट कोहली १२ वर्ष ८६ दिवसानंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळतोय. विराटने त्याचा २३वा रणजी करंडक स्पर्धेतील सामना वयाच्या २४व्या वर्षी खेळला होता आणि त्यानंतर ३६ वर्ष ८६ दिवसांचा विराट आज २४वा रणजी सामना खेळतोय. त्याला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी गर्दीच्या परिस्थितीत गुदमरू नये म्हणून आपल्या मुलांना खांद्यावर उचलले होते. शेवटी जेव्हा गेट उघडले तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी ठोस प्रयत्न केले.