नवी दिल्ली : इस्त्रायल-इराण यांच्यातील संघर्षामुळे ऑगस्ट २०२४ पासून भारत-इस्त्रायल विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता परिस्थिती निवळल्यामुळे या विमानसेवेला पुन्हा सुरुवात करणार असल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. त्यानुसार आगामी २ मार्चपासून तेल अवीवसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत.
यासंदर्भात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीहून तेल अवीव, इस्रायलला आठवड्यातून ५ उड्डाणे चालवतील. एअरलाइन या मार्गावर त्यांचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान तैनात करेल, ज्यामध्ये बिझनेस क्लासमध्ये १८ फ्लॅट बेड आणि इकॉनॉमी क्लासमध्ये २३८ सीट्स असतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी नॉन-स्टॉप उड्डाणे चालविली जातील.
दरम्यान इस्रायलचे पर्यटन मंत्री हैम काट्झ यांनी सांगितले की, आवश्यक मंजुरीनंतर दिल्ली-तेल अवीव मार्गावर पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया आणि इस्रायली एअरलाइन ईआय-एआय द्वारे मुंबई ते तेलअवीव थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आग्रही असल्याचे म्हंटले आहे.