डाॅ. स्वाती गानू
रेवाने फोन केला खरा सोहमला पण चार वेळा रिंग झाली तसा फोन बंद केला. तिला वाटलं कुणास ठाऊक ऑफिसच्या कामात असेल तर वैतागेल आपल्यावर मनातल्या मनात. आई कधीही फोन करते असा विचार करत असेल का तो? फोन करताना तिला अशी धाकधूक नेहमी वाटायची. त्यात जर त्याने फोन उचलला नाही किंवा काॅल बॅक केला नाही, मेसेजला उत्तर दिलं नाही की मन उदास व्हायचं. आपण सोहमवर स्वतःला लादतोय का असं तिला वाटायचं. मग ती अपराधी भावनेने अक्षरशः मिटून जायची. पण मनातलं दुःख ठसठसत राहायचं. तिला कळायचं नाही की मुलाला शिकवण्यात, संस्कार करण्यात, सवयी लावण्यात आपण कुठे कमी पडलो का? तिच्या मनातलं गिल्ट, नाकारले जाणं हे अलीकडे सहन करण्यापलीकडे गेलं होतं. बहुतेक आया या मनोवस्थेतून जातात. आपली मुलं आपल्याशी नेहमी संपर्कात राहत नाहीत, त्यांना आपली पर्वा नाही, काळजी, कन्सर्नमध्ये तर खूपच कमी पडताहेत हे कोणाला धड सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. साधारणतः मुलं मोठी झाली की, आई-वडील हे दुय्यम होतात. मुलांच्या आयुष्यात काॅलेज, मित्रमैत्रिणी, करिअर, कुलिंग नंतरच्या टप्प्यात बायको, तिच्या घरचे लोक, स्वतःचं असणारं कुटुंब हे फर्स्ट प्रायोरिटी असतं. आपोआपच वेळ देताना, काळजी घेताना, जबाबदारी घेताना मुलं दुर्दैवाने दुर्लक्ष करतात. अवघड जागेचं दुखणं अशी आई-वडिलांची परिस्थिती असते. पुरुष आपल्या भावना खूप संयमाने हाताळतात पण स्त्रिया भावुक असतात. त्यांना हा त्रास अधिक होतो.
मग असा त्रास करून घेत राहावा का?
दुःख होतं, वाईट वाटतं पण आधी वस्तुस्थिती ॲक्सेप्ट करायला हवी की हो, मुलांसाठी जो वेळ द्यायला हवा होता आम्ही दोघांनी, तो आम्ही आई-बाबा या नात्याने दिला आहे. शक्य होता तेवढा खर्च केला. त्यांच्या शिक्षणासाठी, यशस्वी झाले तेव्हा कौतुक, फेल्युअर झाले तेव्हा आधारही दिला. चुकले तेव्हा माफ केलं, समज दिली, वेळप्रसंगी धाकही दाखवला. त्यांच्या आनंदात सुखी झालो, दुःखात व्याकुळ झालो आणि आज जर मुलं आपल्यापासून लांब जाताहेत तर जबरदस्तीने त्यांना जवळ आणणं फार सुखाचं ठरत नाही. नाती अशीच असतात गुंतागुंतीची. अटॅचमेंट लवकर होते. डिटॅच होणं सोपं नसतं.
१) म्हणूनच वास्तव मान्य करणं पहिली स्टेप.
२) आपण आपली भूमिका नीट पार पाडली आहे म्हणून अपराधीपणा नको ही दुसरी पायरी.
३) मुलं मोठी झाली आहेत. जबाबदाऱ्या आहेत, त्यांचं कुटुंब तो नीट सांभाळेल ही खात्री ठेवणं ही तिसरी स्टेप.
४) त्याचं आपल्यावरचं प्रेम कमी झालं आहे हे खरं नाही. मनाचा खेळ करत बसल्याने फक्त आपल्याला दुःख होतं.
५) स्पष्ट बोलून आपल्याला वाटणारी भावना व्यक्त करायला हरकत नाही, पण त्यामुळे तुमचे मुलांशी असणारे संबंध तणावपूर्ण होतील ही भीती ठेवून जगणं त्रासदायक आहे. दोनपैकी एकच स्टॅण्ड घेता येतो. मधल्यामध्ये लोंबकळत राहण्याने मन फक्त दुःखी होतं हे कटू सत्य आहे.
६) मुलं अशी वागतात यात तुमची अजिबात चूक नाही. लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेण्यात फार अर्थ नाही.
७) दोन्ही टोकांचा सुवर्णमध्य काढता आला, तर उत्तमच पण स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका.
८) तुम्ही असा स्टॅण्ड घेऊन मुलांशी चुकीचं वागत नाही आहात तर व्यक्तीऐवजी परिस्थितीनुसार स्वतःत बदल करता आहात.
९) मुलांना जेव्हा गरज असेल तेव्हा जरूर मदत करता येईल. कारण डिटॅचमेन्ट म्हणजे आपण समोरच्याची केअर न करणं ठरत नाही. उलट ते स्वतःची केअर करणं आहे.
खरं तर नात्याचे धागे जितके जुने तितकी त्याची वीण अधिक घट्ट होते असं म्हणतात. पण काही वेळेस असं न होता दुरावा निर्माण होतो. अंतर वाढत जातं. पण सत्य स्वीकारणं हेच शहाणपण आहे. ‘हेल्दी डिटॅचमेंट’ खूप उपकारक असते. अटॅचमेंटमध्ये ‘ओनरशिप’, मालकी असण्याचा आविर्भाव असतो. पण डिटॅचमेंटमध्ये असतं ‘स्वातंत्र्य’. एक चांगली गोष्ट शिकता येईल डिटॅचमेंटमधून की,
Detachment from few things might helps you individual to have a hint of your self worth.