जनतेच्या प्रश्नांसाठी सर्व अधिकाऱ्यांना त्या त्या तालुक्यात घेऊन जाणार : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुनगरी : लाऊड स्पीकर वाजविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. ज्याप्रमाणे या देशात हिंदू धर्मीय नागरिक कायदा आणि सुव्यवस्था पाळतात व कायद्याचे पालन करतात, तसेच पालन अन्य धर्मीयांनी करायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणारे आपले हिंदू राष्ट्र आहे. जर या ठिकाणी भोंगा वाजवताना कायद्याची पायमल्ली कोणी करत असतील तर पोलीस कारवाई करतील. आपणही याबाबत दक्ष आहोत. शरीया कायदा किंवा इस्लामिक राष्ट्र म्हणून कोणाचे मनसुबे असतील तर त्याला कट्टर विरोध राहील व कायदा मोडणाऱ्या विरोधात कडक कारवाई करू, असा इशारा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.
तिलारी धरणाचा डावा कालवा दुसऱ्यांदा फुटला, शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले, गोव्याचे पाणी ही बंद झाले, निकृष्ट कामामुळे हा कालवा फुटला याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता, मंत्री नितेश राणे म्हणाले निकृष्ट काम करणाऱ्या त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल. याची गंभीर दखल घेतली जाईल. पुढच्या काळात निकृष्ट काम करण्याचे धाडस कोणत्याही ठेकेदाराने करू नये असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला. तर मुंबई महानगर पालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असे उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितले, यावर बोलताना राणे म्हणाले, स्वबळावर लढण्यासाठी तेवढी क्षमता लागते. ती त्यांच्याकडे नाही. म्हणूनच कालच्या मेळाव्यात गर्दी झाली नाही. भाडोत्री लोक आणून गर्दी करावी लागली. त्यासाठी दोन तास थांबावे लागले याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
Wardha News : ५१ म्हशींची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला, पाच जण अटकेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनैतिक धंदे, ड्रग्ज, दारू, जुगार, मटका तात्काळ बंद करावेत असे आदेश आपण दिले होते. पोलिसांकडून त्याचे अंमलबजावणी तत्काळ सुरू झाली आहे. अनैतिक धंद्यामधील संबंधितांना अटक झाली आहे. या धंद्यात असणाऱ्यां विरोधात पोलिसांकडून झाडाझडतीही सुरू झाली आहे. २५ रोजी पोलीस प्रशासनासोबत एक बैठक घेतली जाणार आहे. ड्रग्ज मुक्त आणि जिहाद मुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी पोलीस दलाकडून काम होणार आहे. कोणावर अन्याय केला जाणार नाही. मात्र या अनैतिक धंद्यामध्ये, अनैतिक व्यापारामध्ये ज्या लोकांचा समावेश असेल त्यांच्यावर कडक कारवाई होईल असे निर्देश ही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जनतेचा मी सेवक आहे. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी ही जनतेचे सेवक आहेत.त्यामुळे जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जनतेने सिंधुदुर्ग नगरी मुख्यालयात यायची गरज नाही. प्रशासनाला घेऊनच आपण त्या त्या तालुक्यात जाणार आहोत. प्रशासकीय पातळीवरील जनतेची कामे रेंगाळू नये यासाठी आपला प्रयत्न आहे. गाव, मंडल, तहसीलदार, उपविभाग या पातळीवर अनेक कामे नागरिकांची असतात. ती प्रलंबित राहतात म्हणूनच आपण जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना घेऊन त्या त्या तालुक्यात उपस्थित राहणार आहोत. याचे वेळापत्रकही आपण लवकरच जाहीर करणार आहोत अशी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना केली.