इंफाळ : केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या आणि बिहारमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त (Janata Dal United – JDU) पक्षाने मणिपूरमधील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. या घोषणेला काही तास होत नाहीत तोच एक धक्कादायक घटना घडली. जनता दल संयुक्तच्या केंद्रीय नेतृत्वाने मणिपूरमधील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. मणिपूरमधील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने केंद्रीय नेतृत्वाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला, असे कारण देत कारवाई करण्यात आली. जनता दल संयुक्तचा मणिपूरमधील भाजपा सरकारला असलेला पाठिंबा कायम आहे. रालोआतून बाहेर पडण्याचा पक्षाचा विचार नाही, असेही जनता दल संयुक्तकडून जाहीर करण्यात आले.
JDUने पाठिंबा काढला आता भाजपा भाकरी फिरवणार, मणिपूरचा मुख्यमंत्री बदलणार ?
जनता दल संयुक्तच्या सरकारला पाठिंबा कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे मणिपूरमधील मुख्यमंत्री बदलाचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. याआधी जनता दल संयुक्तच्या निर्णयाचे निमित्त करुन भारतीय जनता पार्टी मणिपूरमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा विचार करण्याची शक्यता व्यक्त होत होती.
मणिपूरमध्ये ६० सदस्यांची विधानसभा आहेत. या सभागृहात रालोआचे ४५ आमदार आहेत. यात भाजपाचे ३७, नागा पीपल्स फ्रंटचे पाच आणि तीन अपक्ष आमदार आहेत. जनता दल संयुक्तचा एकमेव आमदार सरकारसोबत असल्यास रालोआच्या राज्यातील आमदारांची संख्या ४६ होणार आहे. नॅशनल पीपल्स पार्टीचे सहा, काँग्रेसचे पाच, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन असे १३ आमदार विरोधात आहेत. सभागृहातील एक जागा रिक्त आहे.