Saturday, May 17, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Jalgaon : जळगाव हादरलं! सैराटची पुनरावृत्ती!

लव्ह मॅरेजचा सूड ५ वर्षांनी उगवला; सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवले


जळगाव : ५ वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने वार करत जावयाला ठार केल्याची घटना रविवारी जळगाव (Jalgaon) शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे. मुलीकडच्यांनी केवळ जावयालाच संपवलं नाही तर वार करताना मध्ये पडलेल्या जावयाच्या कुटुंबातील ७ जणांवरही वार करत जखमी केले आहे.


प्रेम विवाहतून झालेल्या या हत्याकांडानंतर संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. परिसरात तणाव आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या भावासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील ६ जणांना अटक करण्यात आली आहे.



या घटनेत मुकेश रमेश शिरसाठ या प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली आहे. या घटनेत जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय. घटनेचा तपास सुरू आहे.


मुकेश रमेश शिरसाठ याने पाच वर्षांपूर्वी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला. तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते. रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने मुकेशच्या मानेवर वार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुकेशचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही मुलीच्या माहेरच्यांनी वार केले असून यात कुटुंबातील ७ जण जखमी झाले आहेत. मुकेशच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी व मुलगी आहे.



माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी; मुकेशच्या आईने फोडला टाहो!


आपल्या मुलाच्या हत्येनंतर मुकेशच्या आईने टाहो फोडत पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. मी धुणं भांड्याचे काम करते. माझा नवरा हमाली करतो, मी कस काय दोन लेकरांना सांभाळू. आता मी त्यांना कसे वाढवू. आम्हाला न्याय पाहिजे. प्रेम विवाह केला म्हणूनच त्यांनी हत्या केली. चार वर्षांपासून ते आम्हाला त्रास देत होते, शेवटी त्याला मारून टाकले असे म्हणत त्यांनी टाहो फोडला. तसेच, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली होती. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलिसांकडून त्यांच्याकडून पैसे खाल्ले, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.


दरम्यान, मुकेश शिरसाठच्या हत्येनंतर त्याची पत्नीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. पूजा शिरसाठ म्हणाल्या की, आपण प्रेम विवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी माझ्या पतीची हत्या केली आहे. पतीच्या हत्येने माझे आणि माझ्या लहान मुलींचे भविष्य अंधकारमय झाले आहे. माझ्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment