Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला दिला नवा दृष्टीकोन'

'छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला दिला नवा दृष्टीकोन'
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस निलगिरी फ्रिगेट, आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण झाले. या प्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल सी. पी. सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. एकाचवेळी तीन नौकांचे राष्ट्रार्पण करण्याच्या ऐतिहासिक सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलला २१ व्या शतकासाठी सशक्त करण्याच्या दृष्टीने एक दमदार पाऊल टाकण्यात आल्याचे सांगितले. देशाने ज्या नौकांचे राष्ट्रार्पण केले त्या स्वदेशी नौका आहेत. या निमित्ताने आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊल टाकल्याचेही पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रार्पणाच्या या ऐतिहासिक क्षणासाठी पंतप्रधान मोदींनी नौका तयार करणारे श्रमिक, माझगाव गोदी, भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय या सर्वांचेच जाहीर आभार मानले.



छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवा दृष्टीकोन दिला. आज त्यांच्या महाराष्ट्रात नौदलाला २१ व्या शतकासाठी सशक्त करण्याच्या दृष्टीने दमदार वाटचाल सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सागरी यात्रा, व्यापार, सागरी संरक्षण, जहाज बांधणी, जल मार्गाने होणारी मालवाहतूक या सर्व क्षेत्रात भारताला समृद्ध इतिहास आहे. या इतिहासातून प्रेरणा घेत भारत अधिकाधिक सशक्त होत आहे. चोल वंशाच्या पराक्रमाला मानवंदना देणारी आयएनएस निलगिरी फ्रिगेट, गुजरातच्या व्यापाऱ्यांनी भारताला पश्चिम आशियाशी जोडले या घटनेची आठवण करुन देणारी आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी या तीन सामर्थ्यशाली नौकांचे राष्ट्रार्पण करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला.



भारताकडे जग एक विश्वासू आणि जबाबदार साथीदार म्हणून बघत आहे. समुद्रात अडचणीत सापडलेल्यांना भारतीय जहाज मदतीला आल्याचे दिसले की धीर येतो. भारताचा भर विस्तारवादावर नाही तर विकासवादावर आहे. भारतानं नेहमी खुल्या, सुरक्षित, सर्वसमावेशक, वैभवशाली इंडो पॅसिफिकचे समर्थन केले. समुद्र किनारा असलेल्या देशांच्या विकासासाठी भारत सागर अर्थात सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन हा मंत्र दिला. भारत हाच दृष्टीकोन घेऊन वाटचाल करत आहे. जी २० परिषदेत भारताने जगाला 'वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर' हे सांगितले. भारत सर्वांची सोबत, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास या विचाराने काम करणारा देश आहे आणि यापुढेही याच पद्धतने काम करेल; असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Comments
Add Comment